जागतिक आरोग्य दिन विशेष : जीवनरेखा हॉस्पिटलचे संचालक डॉ. अमित भाते यांची मुलाखत
मनीषा सुभेदार / बेळगाव
आज 7 एप्रिल म्हणजेच ‘जागतिक आरोग्य दिन.’ आपल्या आरोग्याची काळजी घेताना सर्वांचाच एक प्रश्न आहे तो म्हणजे कोरोनाचा. तथापि, कोरोना जाईल तेव्हा जाईल. आजघडीला आपण काळजी घेणे, आपल्यामुळे इतरांचे आरोग्य धोक्मयात येणार नाही याची दक्षता घेणे आणि आपल्या कुटुंबीयांना जपणे इतके करणे आपल्याला नक्कीच शक्मय आहे. सध्या कोरोना आणि लसीकरण हे दोन विषय ऐरणीवर आहेत. या अनुषंगाने जीवनरेखा हॉस्पिटलचे संचालक डॉ. अमित भाते यांची ही मुलाखत. विशेष म्हणजे लसीच्या चाचणीसाठी भारतातील ज्या 12 वैद्यकीय संस्था किंवा हॉस्पिटल निवडली गेली त्यामध्ये जीवनरेखाचा समावेश आहे.
प्रश्न : लसीच्या चाचणीसाठी जीवनरेखाची निवड कशी झाली?
उत्तर : ‘जीवनरेखा’ ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) शी थेट निगडीत आहे. कोणतेही संशोधन करण्यासाठी किंवा चाचणीसाठी एक नैतिक समिती (एथिक्स कमिटी) करावी लागते. अशी कमिटी ‘जीवनरेखा’मध्ये आहे. यापूर्वी जीवनरेखामध्ये टायफॉईड, रेबिज अशा लसींची चाचणी झाली आहे. त्यामुळे कोरोना लसीच्या चाचणीसाठी जीवनरेखाची निवड झाली.
प्रश्न : आतापर्यंत किती चाचण्या पूर्ण झाल्या?
उत्तर : ‘जीवनरेखा’मध्ये को-व्हॅक्सिन आणि झायडस अशा दोन लसींच्या चाचण्या झाल्या. पहिल्या टप्प्यात चार, दुसऱया टप्प्यात 50 व तिसऱया टप्प्यात 2250 जणांच्या को-व्हॅक्सिन चाचण्या पूर्ण झाल्या. झायकोडी या चाचण्या दुसऱया व तिसऱया टप्प्यात पूर्ण झाल्या. दुसऱया टप्प्यात 18 वर्षांवरील 175 तर तिसऱया टप्प्यात बारा वर्षांपुढील एकूण 1700 जणांच्या चाचण्या पूर्ण झाल्या. यामध्ये 12 ते 18 वयोगटातील 20 मुलांची चाचणी करण्यात आली. ही सर्व मुले स्वयंस्फूर्तीने आली होती, हे विशेष होय.
प्रश्न : लसीकरण कसे उपयुक्त ठरणार आहे?
उत्तर : कोविशिल्ड ही ‘ऍडीनो व्हायरस व्हॅक्सिन’ आहे. ‘को-व्हॅक्सिन ईन ऍक्टीव्ह ऍन्टीजेन’ आहे. म्हणजेच विषाणूच्या बाह्य आवरणाचा भाग काढून तोच शरीरात सोडला जातो. त्यावेळी तो निष्क्रिय (इनऍक्टीव्ह) असतो. शरीरात हा भाग सोडल्यानंतर शरीराच्या लक्षात येते की कोणती तरी फॉरेन बॉडी शरीरात आली आहे. त्याचा सामना करण्यासाठी शरीर ऍन्टीबॉडीज म्हणजेच प्रतिजैवके तयार करते आणि विषाणू नष्ट होण्यासाठी सक्रिय होते. एका अर्थाने काटय़ाने काटा काढण्याचाच हा प्रकार आहे.
प्रश्न : लस घेतल्याने साईड इफेक्ट्स होतात, हे खरे आहे का?
उत्तर : हो. लस घेतल्यानंतर साईड इफेक्ट्स जाणवलेच पाहिजेत. कारण लस आपले काम करते आहे याचे ते लक्षण आहे. त्यामुळे लसीकरणानंतर शरीराचे तापमान वाढते, म्हणजेच ताप येतो. फॉरेन बॉडी शरीरात आल्याने शरीराला सवय नसते. त्यामुळे जडत्व येते, अंग दुःखू लागते. परंतु ही सर्व लक्षणे दोन ते तीन दिवसच राहतात. त्यामुळे फार असे साईड इफेक्ट्स होत नाहीत. मुख्य म्हणजे भारतात झायडसच्या 28 हजार व को-व्हॅक्सिनच्या 26 हजार चाचण्या केल्या गेल्या आहेत. त्यापैकी कोणालाही फार मोठा साईड इफेक्ट जाणवलेला नाही.
प्रश्न : लसीकरणामध्ये भारत कोठे आहे?
उत्तर : वरील सर्व लस भारतातच तयार झाल्या आहेत. मात्र, कोविशिल्ड ऑक्स्फर्डमध्ये तयार झाली असून त्याचे उत्पादन भारतात सुरू आहे. आपण लसीच्या बाबतीत आत्मनिर्भर आहोत. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेने सर्वांना एकाचवेळी लस मिळण्यात अडचणी येत आहेत. 60 टक्के लसींची निर्मिती भारतातच झाली आहे. त्यामुळे लवकरच सर्वांना लस उपलब्ध होऊ शकते.
प्रश्न : पूर्वी 60 आणि आता 45 वयोगटावरील लोकांना लस देण्यात येत आहे. यातून तरुणवर्ग का वगळला गेला?
उत्तर : तरुणांमध्ये प्रतिकारशक्ती अधिक आहे. जेष्ठाना लवकर प्रादुर्भाव होऊ शकतो. म्हणून हा वयोगट निवडला गेला. 45 वर्षावरील ज्यांना बीपी, शुगर आहे त्यांना प्रादुर्भाव होऊ शकतो. म्हणून तो वयोगट अलीकडे निवडला गेला. तरुणाईला कोरोना झाला आणि वेळीच उपचार घेतले तर ते निश्चित बरे होऊ शकतात. बहुसंख्य तरुणांना सायनस किंवा खोकला असा त्रास जाणवला आणि नंतर त्यांचा कोरोना बराही झाला. यासाठी त्यांना सध्या वगळण्यात आले आहे.
प्रश्न : लसीबाबत समाजात अंधश्रद्धा आहेत. अद्यापही लोक पुढे येत नाहीत, याचे कारण काय?
उत्तर : बरोबर आहे. समाजात ‘व्हॅक्सिन हेजीटन्सी’ म्हणजेच व्हॅक्सिन घेण्याबाबत टाळाटाळ अधिक आहे. सोशल मीडियावरून चुकीचे संदेश फिरत आहेत. त्यामुळे एक नकारात्मकता वाढत आहे. परंतु कोरोनाची लाट येतच राहणार. लस घेतल्यानंतर एक ते दोन वर्षे आपल्या शरीरात ऍन्टीबॉडीज टिकून राहतात. त्यामुळे एक वर्षात सर्वांचे लसीकरण व्हायला हवे. त्यानंतर बुस्टर स्वरुपात हीच लस दिली गेल्यास 10 वर्षे त्याचा परिणाम टिकून राहतो.
प्रश्न : लस दिल्यानंतरही कोरोना होऊ शकतो का?
उत्तर : हो. कारण एक डोस दिल्यानंतर शरीरात लगेच ऍन्टीबॉडीज तयार होत नाहीत. यासाठी 0 ते 28 दिवसांचा कालावधी लागतो. दुसऱया डोसनंतर 80 ते 90 टक्के ऍन्टीबॉडीज तयार होतात. तथापि, कोरोनाचा प्रतिकार करण्याइतकी क्षमता शरीरात नक्कीच निर्माण झालेली असते. मात्र, प्रकृतीमानानुसार काही बदलसुद्धा होऊ शकतात, हे गृहीत धरायला हवे.
प्रश्न : लहान मुलांना दुसऱया लाटेने लक्ष्य केले आहे, याचे कारण काय?
उत्तर : दुसऱया लाटेतील कोरोना विषाणूंची काही प्रतिजैवके अधिक प्रबळ आहेत. याला म्युटेड व्हायरस म्हटले जाते. म्हणजेच व्हायरसच्या पार्टिकल्समधील प्रोटीन ऍन्टीजेन हे घटक अधिक प्रभावी होतात. त्याला सुपरस्प्रेड असे म्हटले जाते. हा म्युटेड व्हायरस बालकांना लक्ष्य करत आहे. कोरोनामुळे केवळ मेंदूच नव्हे तर पाय, फुफ्फुस, हृदय कोठेही क्लॉट निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मुलांवर अधिक परिणाम होत आहे.
प्रश्न : आरोग्य दिनाच्या निमित्ताने आपण काय संदेश द्याल?
उत्तर : अति (खरे तर फाजील) आत्मविश्वास बाळगू नका. कोरोना आहे तो राहणारच, तो जाणार नाही. त्यासाठी लस आणि नियमांचे पालन हा एकमेव उपाय आहे. लसीवर विश्वास ठेवा, ती सरकारने तयार केली आहे. सरकारवर विश्वास नसेल तरीही ठीक आहे. त्यामध्ये राजकारण आणू नका. परंतु ड्रग्ज कंट्रोल ऑफ इंडिया ही अत्यंत जबाबदार संस्था आहे. वैज्ञानिक, शास्त्रज्ञ, डॉक्टर यांचा यामध्ये समावेश आहे. लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी संस्था बांधिल आहे. तेव्हा लस घ्या, नियम पाळा आणि सुरक्षित रहा.
लहान मुलांची काळजी अधिक जबाबदारीने घ्यायला हवी
दुसऱया लाटेने लहान मुलांना लक्ष्य केले आहे. लॉकडाऊन उठल्यानंतर आलेला निर्धास्तपणा गंभीर ठरणार आहे. लहान मुलांना घेऊन सण-समारंभाला जाणे महागात पडू शकते. लहान मुले आणि वृद्ध माणसे घरी असतात. पण बाहेर पडणारे नोकरदार, पालक, नागरिक घरी जाऊन या दोन घटकांना प्रादुर्भाव करू शकतात. लहान मुलांची काळजी या दुसऱया लाटेत अधिक जबाबदारीने घ्यायला हवी, असे डॉ. भाते सांगतात.