नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील कोरोना उद्रेकाची स्थिती दिवसेंदिवस अधिकच चिंताजनक होत आहे. नियमांचे पालन केले नाही, तर ती हाताबाहेर जाण्याची शक्यता असून सारा देश धोक्यात पडू शकतो, असा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी दिला. सध्या सहा राज्यांमध्ये विशेष चिंतेची परिस्थिती आहे. मात्र, हे लोण देशभरात पसरण्यास वेळ लागणार नाही, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
सोमवार संध्याकाळ ते मंगळवार संध्याकाळ या 24 तासांच्या काळात देशात 56,211 नवे कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आतापर्यंतच्या एकंदर रूग्णांची संख्या 1 कोटी 20 लाखांहून अधिक झाली आहे. यापैकी 1 कोटी 13 लाखांपेक्षा अधिक लोक बरे झाले असून सध्या 5 लाख 40 हजार उपचाराधीन रूग्ण आहेत. तर आतापर्यंत 1.62 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्राचा क्रमांक रूग्ण आणि मृत्यूसंख्येत पहिला आहे. या राज्यासह पंजाब व केरळ आणि इतर पाच राज्ये यांच्यात एकंदर रूग्णांपैकी 84.5 टक्के रूग्ण आहेत. दिल्लीत गेल्या 24 तासांमध्ये नवे 1,900 रूग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रातील स्थिती सर्वात वाईट आहे. एकंदर नव्या रूग्णांपैकी 60 टक्क्यांहून अधिक याच राज्यात आहेत. त्याखालोखाल पंजाबमध्ये रूग्णसंख्या वाढत आहे.
45 वरील सर्वांना लस
45 वर्षांवरील सर्वांना लस दिली जाण्याचा कार्यक्रम केंद्र सरकारने घोषित केला आहे. तो 1 एप्रिलपासून लागू करण्यात येईल. देशात लसीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. परिणामी, कोणीही लसीपासून वंचित राहणार नाही. आतापर्यंत जवळपास 6 कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. लस टोचून घेण्याऱयांचे प्रमाणही वाढत आहे, असे केंद्रीय आरोग्य विभागाने मंगळवारी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात लॉकडाऊनचा विचार ?
महाराष्ट्रातील परिस्थिती लवकरच हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. सर्वाधिक रूग्ण याच राज्यात सापडत असल्याने तेथे काही काळापुरता लॉकडाऊन लागू करावा काय यावर राज्य प्रशासन विचार करीत आहे. तथापि, सध्याच्या काळात लॉकडाऊन शक्य नाही. कारण अर्थव्यवस्थेचाही प्रश्न आहे. त्यामुळे तो शेवटचा पर्याय ठरेल. मात्र, तशी चर्चा राजकीय वर्तुळात असल्याने मुंबई व इतर शहरांमधील स्थलांतरित कामगार चिंतेत आहेत. पुन्हा आपल्या मूळ राज्यात परतावे लागणार का, हा प्रश्न त्यांना सतावत आहे, असे सांगण्यात आले.