प्रतिनिधी/ पणजी
सर्व सोयी सुविधांनी युक्त असूनही बंद पडलेली राज्यातील विविधी इस्पितळे ताब्यात घेऊन सरकारने तेथे कोरोना रुग्णांवर उपचार करावे, अशी मागणी महिला काँग्रेसने केली आहे. त्यासंबंधीचे निवेदन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना सादर करण्यात आले असून वाढत्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी त्वरित पावले उचलावी अशी मागणीही केल्याचे महिला काँग्रेस अध्यक्ष बीना नाईक यांनी सांगितले.
कुंकळ्ळी येथील वॉकहार्ड इस्पितळ, म्हापसातील वृंदावन, बायणा वास्कोतील विश्व संजीवनी आणि काणकोण येथील ढवळीकर इस्पितळ (जे सध्या रिसोर्टमध्ये परावर्तीत करण्यात आले आहे), ही इस्पितळे ताब्यात घेण्यासंबंधी सरकारने त्यांच्या व्यवस्थापनाशी चर्चा करावी व तेथे कोरोना रुग्णांवर सुरू करावे, असे या समितीने मुख्यमंत्र्यांना सूचविले आहे.
त्याशिवाय गोव्यातील सुमारे 150 युवतींनी कर्नाटकातील ’घटप्रभा’ येथे नर्सिंग प्रशिक्षण घेतले आहे. सध्या त्या नर्सीस् गोव्यात आहेत. सरकारने त्यांनाही सेवेत सामावून घेताना सध्या भासणाऱया आरोग्य कर्मचाऱयांच्या कमतरतेवर मात करावी, असेही समितीने निवेदनातून सरकारला सूचविले आहे.