कुडाळ पं. स. बैठकीत मागणीचा ठराव : कुडाळ तालुक्यात रस्त्यांची दुर्दशा : एकाही रस्त्याची पावसापूर्वी डागडुजी नाही
‘साबां’च्या उपअभियंता सलग पाच बैठकांना अनुपस्थित
प्रतिनिधी / कुडाळ:
तालुक्मयात रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. एकाही रस्त्याची डागडुजी पावसापूर्वी झालेली नाही. बैठकीस उपस्थित राहून सार्वजनिक बांधकाम विभाग (कुडाळ) च्या उपअभियंता यांनी माहिती द्यावी, अशी सभागृहात मागणी होत असतानाही गेले सलग पाच बैठकांना ओरोसचा कार्यभार असल्याचे सांगून उपस्थित न राहणाऱया या उपअभियंत्यांकडील अतिरिक्त असलेला कार्यभार काढून घ्यावा, अशी मागणी करणारा तसेच ‘कोविड-19’ या कालावधीतील तीन महिन्यांचे वीजबिल माफ करावे, असे दोन ठराव शुक्रवारी येथे झालेल्या कुडाळ पंचायत समितीच्या मासिक बैठकित सदस्य मिलिंद नाईक यांनी मांडले. दोन्ही ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.
ही बैठक आज पं. स. च्या छत्रपती संभाजीराजे सभागृहात सभापती नूतन आईर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपसभापती जयभारत पालव, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई यांच्यासह सदस्य राजन जाधव, मिलिंद नाईक, संदेश नाईक, बाळकृष्ण मडव, गोपाळ हरमलकर, डॉ. सुबोध माधव, ऍड. अनघा तेंडोलकर, शरयू घाडी, मथुरा राऊळ, स्वप्ना वारंग, प्राजक्ता प्रभू, सुप्रिया वालावलकर, निलिमा वालावलकर आणि खातेप्रमुख उपस्थित होते. प्रारंभी लडाख संघर्षात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्याचा ठराव जयभारत पालव यांनी मांडला.
..तोपर्यंत बैठक पुढे सुरू करू नये!
मागील बैठकीच्या इतिवृतावर चर्चा सुरू असताना संदेश नाईक यांनी कुडाळ-मालवण रस्त्याच्या सद्यस्थितीची माहिती दिली. याबाबत गेले पाच महिने सभागृहात रस्त्याचे काम करण्याबाबत चर्चा करीत आहे. दरवेळी नवीन अधिकारी येतात. चुकीची माहिती देतात. काम होत नाही. कुडाळ विभागाच्या अनामिका जाधव यांनी सभागृहात येऊन माहिती द्यावी, तोपर्यंत बैठक पुढे सुरू करू नये, असे सांगितले. मिलिंद नाईक, बाळकृष्ण मडव, सुप्रिया वालावलकर, निलिमा वालावलकर, राजन जाधव आदींनी बांधकाम विभागाच्या कामांचा पाढा वाचला. दरम्यान, पालव यांनी मोबाईलवर श्रीमती जाधव यांच्याशी संपर्क साधला. ओरोसचा अतिरिक्त कार्यभार असल्याने ओरोसला असल्याचे त्यांनी सांगितले. तेव्हा मिलिंद नाईक यांनी हा ठराव मांडला.
खेडय़ात विजेचा लपंडाव सुरू
पाऊस सुरू झाल्यानंतर खेडय़ात विजेचा लपंडाव सुरू आहे. वीज वाहिन्यांना लागणाऱया झाडांच्या फांद्या तोडल्या नाहीत, याकडे जाधव, डॉ. माधव, मिलिंद नाईक, संदेश नाईक, सुप्रिया वालावलकर आदींनी लक्ष वेधला असता, कामे झाल्याची माहिती उपस्थित अधिकाऱयांनी दिली. त्याला मिलिंद नाईक यांनी आक्षेप घेत कुठची कामे केला ती सांगा?, असे आव्हानच दिले. संबंधित अधिकारी ही माहिती देऊ शकले नाहीत. लॉकडाऊन कालावधीत लोकांना काम नसल्याने त्यांची आर्थिक स्थिती ढासळली आहे. तीन महिन्यांनी येणारी बिले ते भरू शकणार नाहीत, याकडे जाधव यांनी लक्ष वेधले असता, मिलिंद नाईक यांनी ठराव मांडला.
तालुक्यात सर्वत्र बसफेऱया सुरू करा
तीन ते चार बैठकांना कुडाळ एस. टी. आगारप्रमुख सुजीत डोंगरे उपस्थित नसल्याने एस. टी. ची माहिती मिळत नाही. सध्या ज्या फेऱया सुरू केल्या, त्याला निकष काय? एकाच भागात फेऱया सुरू करण्यामागे कारण काय?, असे मिलिंद नाईक यांनी विचारत तालुक्मयातील सर्व भागात फेऱया सुरू झाल्या पाहिजेत, अशी सूचना केली. यावेळी झालेल्या चर्चेत सर्व सदस्यांनी भाग घेतला. मडव यांनी जांभवडे येथील ग्रामसेवकाच्या कामाचे पाढे वाचले.
असाही ‘कोरोना घोटाळा’
बैठकीत शिक्षण विभागावर चर्चा सुरू असताना प्रभारी गटशिक्षणाधिकारी सूर्यभान गोडे शाळा केव्हापासून आणि कोणती दक्षता घेऊन सुरू होतील, याची माहिती देत असताना ‘कोरोना घोटाळा’, असे त्यांनी म्हटले आणि सभागृहात एकच हंशा पिकला. ‘कोरोना घोटाळा’ हा काय प्रकार?, असे मिलिंद नाईक यांनी विचारले, तर ‘याला म्हणतात शिक्षण विभाग’, असा सूर सदस्यांमधून निघाला. प्रसंगावधान राखत गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी सूत्रे हाती घेत ‘कोरोना महामारी’, असे सांगून शासनाच्या ‘जीआर’ची माहिती दिली.