विविध आयटी कंपन्या रोजगाराची दारे उघडणार – रोजगारात टीसीएस अव्वल
वृत्तसंस्था/ मुंबई
कोरोनाच्या संकटामुळे विविध क्षेत्रातील अनेकांना आपल्या रोजगारावर पाणी सोडावे लागले असल्याचे पहावयास मिळाले आहे. परंतु याच दरम्यान टेक्नॉलॉजीच्या वाढत्या मागणीमुळे आयटी प्रोफेशनल्सना अधिक मागणी राहिली आहे. कारण आयटी क्षेत्राने कोरोना संकटात अनेकांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. सोबत कंपन्यांनी जुन्या कर्मचाऱयांच्या वेतनात वाढही केली आहे.
या क्रमवारीत टीसीएस यांचे नाव अग्रस्थानी आहे. देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असणारी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस)ने आर्थिक वर्ष 2021 च्या पहिल्या तिमाहीत जवळपास 20,409 नवीन कर्मचाऱयांना कंपनीसोबत जोडले आहे. यासोबतच कंपनीमध्ये एकूण 5 लाखापेक्षा अधिक कर्मचारी आहेत. तसेच आर्थिक वर्ष 2022 मध्ये 40,000 प्रेशर्सची भरती करणार असल्याचे संकेत आहेत.
टीसीएस जगात दुसऱया स्थानी
जगातील विविध दिग्गज आयटी कंपन्यांमध्ये प्रमुख कंपनी म्हणून टीसीएस कंपनीचा उल्लेख आवर्जून केला जातो. कर्मचारी भरती करणाऱया कंपन्यांमध्ये भारतामधील टीसीएस ही सर्वात मोठी कंपनी बनली आहे. जागतिक पातळीवरील आकडा पाहिल्यास एक्सेंचर पहिल्या स्थानी आहे. ज्यामध्ये 5.37 लाख कर्मचारी आहेत. तर टीसीएस दुसऱया स्थानी राहिली आहे.
एचसीएल
एचसीएल टेक्नॉलॉजीने आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये भारतात 15 हजार प्रेशर्सना नोकरी देण्याची योजना बनवली असल्याची माहिती दिली आहे. यासोबतच कंपनी 1500 ते 2000 कर्मचारी क्लाएंट लोकेशनवर नियुक्त करणार आहे.
इन्फोसिसने आकडा वाढविला
इन्फोसिसने आर्थिक वर्ष 2022 मध्ये 24 हजार कॉलेज पदवीधरांना रोजगार देणार असल्याचा निर्णय घेतला आहे. कॉलेजच्या विद्यार्थ्यांना संधी देण्यात कंपनीने मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 15 हजारने आकडा वाढविला आहे.
कॉग्निझेंट टेक्नॉलॉजी
कॉग्निझेंट टेक्नॉलॉजी सोल्यूशन्स कॉपोर्रेशनमध्ये भारतामध्ये जवळपास 2 लाख कर्मचारी आहेत. तसेच कंपनीने 2021 मध्ये देशात 23 हजार लोकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचा विचार चालवला आहे. यासोबतच मागील वर्षाच्या तुलनेत चालू वर्षात भरतीत 35 टक्क्यांची वाढ केली आहे.