कोकणातील कोरोना नियंत्रण लवकरच होईल अशी आशा बाळगली जात आहे. तथापि, सरकारी यंत्रणेकडून ढिलाई मोठय़ा प्रमाणात दाखवली जात आहे. यावर उपाय म्हणून आता लोकांनी अधिक काळजी घेणे सुरू केले आहे.
यावर्षीचा गणेशोत्सव पुढील बऱयाच काळासाठी कोकणवासियांच्या लक्षात राहणारा ठरणार आहे. शिगमा आणि गणेशोत्सव हे दोन सण लोकांसाठी खूप महत्त्वाचे ठरले आहेत. पिढय़ा न् पिढय़ा कोकणी माणूस या सणांमध्ये रंगून जात असतो. यावर्षी सुरू असलेला गणेशोत्सव आजवरच्या सर्व उत्सवांपेक्षा वेगळा असून त्याची अनुभूती घेतली जात आहे.
रत्नागिरी जिह्यात कोरोना रोगाच्या फैलावासंदर्भात प्रशासन काळजी घेत आहे असे सांगितले जात आहे. सिंधुदुर्गातही तशीच परिस्थिती आहे. रत्नागिरी जिह्यात आतापर्यंत 3,500 हून अधिक रुग्णसंख्या झाली आहे. यापैकी 2,200 रुग्ण बरे होऊन नेहमीचे जीवन जगू लागले आहेत. 121 जण प्राणाला मुकले आहेत. रुग्ण वाढीचा दर रत्नागिरी जिह्यात कमी झाला आहे. दर दिवशी रुग्ण सापडण्याचे प्रमाण 100 च्या आसपास असताना आता ते त्यापेक्षा कमी आले आहे. दुसऱया बाजूला सिंधुदुर्ग जिह्यात रुग्ण संख्या वाढीचा वेग लक्षणीय ठरत आहे. सिंधुदुर्ग जिह्यात सोमवारी 60 नवे रुग्ण सापडले. तेथील रुग्णवाढीचा दर का वाढत आहे याकडे प्रशासनाकडून अभ्यास सुरू झाला आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यांमध्ये रुग्णवाढीचा दर कमी आहे. तथापि, चाकरमान्यांना मे महिन्यात आणि आता गणेशोत्सवात मोठय़ा प्रमाणात गावाकडे येण्यासाठी परवानगी दिली गेली. त्यातून रुग्ण वाढ झाली.
कोरोना रोगाला प्रतिबंध करण्यासाठी कोकणच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर काही ना काही काम चालू आहे. एका बाजूला अमर्याद अधिकारी आणि दुसऱया बाजूला अंमलबजावणीची हेळसांड यामुळे प्रशासनाला व्यावसायिक कामे प्रभावीपणे करता आलेली नाहीत. कोरोना नियंत्रणासाठी लोकांनी सहकार्य करावे ही बाब योग्य असली तरी प्रशासनाने त्यांचे दायित्व पार पाडले पाहिजे.
राज्याच्या इतर भागाप्रमाणे रत्नागिरी, सिंधुदुर्गात कोरोना प्रतिकारासाठी आणि उपचारांसाठी काही व्यवस्था लावण्यात आली आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांना स्वतंत्रपणे ठेवण्यात येत आहे. तेथे 10 दिवसांच्या मुक्कामानंतर रुग्णांना घरी सोडण्यात येत आहे. पुढचे सात दिवस त्या रुग्णाने अलग रहावे म्हणून हातावर शिक्का मारण्यात येत आहे. लक्षणे नसली आणि अलगीकरण केंद्रातून घरी सोडण्यात आले असले तरी पुढील सात दिवस त्या रुग्णापासून संसर्ग होऊ शकतो अशी भीती असल्याने सात दिवसाचे अलगीकरण काटेकोरपणे राबवावे म्हणून सांगण्यात येते. अलगीकरण केंद्रातून बाहेर पडणारे रुग्ण मोठय़ा आनंदात असतात. परंतु त्यांना सुरक्षितपणे घरी सोडण्याची कोणतीच व्यवस्था नसते. हे रुग्ण अलगीकरण केंद्रातून बाहेर पडल्यावर मिळेल त्या वाहनाने घरी परततात. भाडय़ाने मिळणारी चार चाकी गाडी, ऑटो रिक्षा, एसटी बसदेखील हे रुग्ण निवडत असतात. यापैकी काहीच मिळाले नाही तर परिचित व्यक्तीच्या दुचाकीवरून रुग्ण घरोघरी परतत आहेत. घरी परतताना सामाजिक अंतराचे बंधन पाळले जात नाही. कोरोना संसर्गाची शक्यता मोठय़ा प्रमाणात असतानाही लोकांना घरी सोडण्याची व्यवस्था सुरक्षित शासकीय वाहनातून करण्यात येत नाही.
अनेक लोकांना ताप, सर्दी, खोकला येतो म्हणून ते कसे ना कसे शासकीय रुग्णालयापर्यंत पोहोचत आहेत. तेथे स्वॅब तपासणीसाठी देत आहेत. अशा रुग्णांना कोरोना झालेला असण्याची शक्यता असतानाही त्यांना घरी सोडण्यात येते. घरी सोडताना आरोग्य यंत्रणा नेमकी काळजी घेताना दिसत नाही. ताप येणारा व तपासणीसाठी नमुना दिलेला हा रुग्ण आपल्या घरी जाताना कुणाच्या तरी दुचाकीवरून घरी पोहोचतो. दुचाकीस्वाराला रुग्णाची कोरोना संभाव्यता माहिती नसल्याने तो समाजात मिसळत असतो. यातून कोरोना मोठय़ा प्रमाणावर वाढत असताना त्यावर नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा ठामपणे उभी राहत नसल्याचे दुर्दैवी चित्र पुढे आले आहे.
रुग्णालयामध्ये रुग्णांना खासगी कपडे वापरण्याची मुभा दिली जात आहे. कोरोना रुग्णांचे कपडे धुण्याचे काम वाढू नये म्हणून ही कार्यपद्धती रत्नागिरी जिह्यात अवलंबली जात आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना विशिष्ट गणवेश देण्याची प्रथा आहे. रुग्णाला त्याचे कपडे सोयीचे असावेत. शिवाय उपचार करणाऱया व्यवस्थेला रुग्णाचे कपडे अडचण ठरू नयेत अशी अपेक्षा असते. कोरोना रुग्णांना शासकीय शिष्टाचाराचा गणवेश दिला जात नसला तरी त्यामागचे कारण मात्र लोकांना सांगितले जात नाही. राज्य सरकारने एसटी आणि रेल्वे सेवा सुरू करून चाकरमान्यांना कोकणात येण्याची मोठी संधी उपलब्ध करून दिली. हे करताना अलगीकरणाचा कालावधी दहा दिवसांवर आणला. आता तरी एसटीने येणाऱया लोकांना दहा दिवसांचे बंधनही ठेवण्यात आलेले नाही. हे लोक गावात खुलेआम फिरत आहेत. अशाप्रकारांना पायबंद घालण्यासाठी अनेक गावच्या गावकऱयांनी पुढे यायला सुरुवात केली आहे. सरकारी पातळीवर क्वारंटाईनचे नियम काहीही असोत परंतु गावात मात्र सर्व लोकांशी मिळून मिसळून रहायचे असेल तर चौदा दिवसांचे अलगीकरण महत्त्वाचे आहे अशी भूमिका अनेक सरपंचांनी घेतली त्यामुळे चाकरमान्यांचा गावातील वावर मर्यादित झाला आहे.
कोकणातील कोरोना नियंत्रण लवकरच होईल अशी आशा बाळगली जात आहे. तथापि, सरकारी यंत्रणेकडून ढिलाई मोठय़ाप्रमाणात दाखवली जात आहे. यावर उपाय म्हणून आता लोकांनी अधिक काळजी घेणे सुरू केले आहे. शेवटी स्वतःच स्वतःचा रक्षक म्हणत लोकांना पुढे यावे लागत आहे.
सुकांत चक्रदेव