कोरोनाच्या उद्रेकामुळे अनेक बालकांनी आपले माता-पिता गमाविले आहेत. या बालकांसमोर त्यांच्या भवितव्याचा प्रश्न यामुळे उभा ठाकला आहे. तथापि असेही काही सहृदय लोक आहेत की ज्यांनी या निराधार बालकांच्या पालनपोषणाचे उत्तरदायित्त्व स्वीकारले आहे. अनेक महिलांनी आपल्या नात्यातील अशा बालकांना मोठे करण्याचे काम स्वतःहून स्वीकारले आहे. या महिला आधुनिक काळातील ‘यशोदा’च म्हणाव्या लागतील. देवकीपासून दूर झालेल्या बाळकृष्णाला मातृप्रेमाची उणीव यशोदेने जाणवू दिली नव्हती. त्याचप्रमाणे या महिलाही माता-पिता गमाविलेल्या या बालकांना मातृत्त्वाचा आधार देत आहेत.
असिमा भट्ट या अशाच एक महिला आहेत. त्या रंगमंच कलाकार आणि लेखिकाही आहेत. त्यांनी कोरोनामुळे अनाथ झालेले अनेक बालकांना आधार दिला आहे. स्वतः तसेच स्वयं साहाय्यका गटांच्या माध्यमातून त्यांनी अनेक अनाथ मुले सांभाळण्यासाठी घेतली आहेत. असिमा यांना स्वतःचे संतान नाही. त्यांनी आता या बालकांनाच आपली मुले मानली आहेत. या मुलांना शिकवून मोठे करणे आणि स्वतःच्या पायावर उभे करणे हे त्यांचे जीवन ध्येय बनले आहे.
माता गमाविलेले बालकांना मानसिक आधार देणे सर्वात महत्त्वाचे असते. विशेषतः जी बालके नेनत्या वयाची नाहीत व ज्यांना आपले आई-वडील नाहीत हे समजू शकते अशा बालकांना मानसिक आधाराची सर्वाधिक आवश्यकता असते. असिमा भट्ट यांनी त्यांची ही आवश्यकता ओळखून बालमानसशास्त्राचा अभ्यास सुरू केला आहे. अशा तऱहेने त्यांनी या बालकांची परिपूर्ण माता बनण्यासाठी प्रयत्न चालविलेले आहेत. त्यांना समाजाचेही मोलाचे साहाय्य मिळत आहे.