संयुक्त राष्ट्रसंघातील भाषणात पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन : भारतात 83 कोटी लोकांना अन्नसुरक्षा पुरविल्याची माहिती
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रात्री व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेला संबोधित केले. या भाषणात त्यांनी कोरोना संकटाचा उल्लेख करून जगासमोरील आव्हान मोठे असल्याचे सांगितले. देशातील 83 कोटी नागरिकांना अन्नसुरक्षा कायद्याने धान्य, डाळी, तेल यांचा पुरवठा करणारा भारत हा जगातला एकमेव देश असल्याचे पंतप्रधान याप्रसंगी म्हणाले. तसेच कोविड काळात जनआंदोलन उभे करत भारताने यशस्वी सामना करत जगभरातील अनेक देशांनाही मदत केल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
भारत सुरक्षा परिषदेचा हंगामी सदस्य झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेसमोर भाषण केले. त्यांचे हे पहिलेच संबोधन असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व होते. या भाषणात मोदींनी भारताने कोविडच्या काळात केलेल्या प्रभावी कामगिरीचा लेखाजोखा मांडला. तसेच सरकारच्या काही महत्त्वाच्या योजनांची माहितीही देण्याचा प्रयत्न केला. संयुक्त राष्ट्रांच्या अमृत महोत्सवी वर्ष सोहळय़ाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे आयोजन करण्यात आले होते.
देशातील 40 कोटी नागरिकांची बँक खाती सुरू करुन त्यांना सरकारी सबसिडी थेट बँक खात्यात देऊन भारताने सरकारी व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि अचूकता आणल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. गरिबांच्या आरोग्यासाठी सुरू केलेली आयुष्मान योजना ही जगातली सर्वात मोठी आरोग्य योजना असल्याची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली. भारतात महिला सशक्तीकरणासाठी अनेक योजना सुरू आहेत. प्रत्येक घरात शौचालय, प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर अशा योजना राबवून भारत सरकार देशातील नागरिकांच्या किमान गरजा पूर्ण करण्यासाठी वेगाने काम करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. प्लास्टिकचा पुनर्वापर, नैसर्गिक ऊर्जास्त्राsतांचा जास्तीत जास्त वापर, कचऱयाच्या विल्हेवाटीसाठी अभिनव योजना राबवून निसर्गाची कमीत कमी हानी व्हावी यासाठी सरकार काम करत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
आत्मनिर्भर योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चालना
कोरोना संकट आले तरी भारतात जगाच्या तुलनेत मृत्यूदर कमी आहे. महत्त्वाचे म्हणजे कोरोनावर मात करण्यासाठी भारताच्या प्रयत्नांतून सार्क देशांनी कोरोना फंड उभा केला आहे. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी भारताने आत्मनिर्भर योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
मोदींच्या भाषणाकडे जगाचे लक्ष
मागील महिन्यातच भारताने संयुक्त राष्ट्रांतील 192 पैकी 184 मतांच्या जोरावर सुरक्षा परिषदेत दिमाखात प्रवेश केला होता. भारताची 2021 आणि 2022 या दोन वर्षांसाठी सुरक्षा परिषदेवर निवड झाली आहे. मात्र एवढा प्रचंड पाठिंबा मिळवणाऱया भारताचे पंतप्रधान आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांवर काय भूमिका मांडतात याकडे जगाचे लक्ष लागले होते. जगातील सर्वात मोठा लोकशाहीप्रधान देश अशी भारताची ओळख आहे. ही ओळख प्रभावी करण्याच्यादृष्टीने मोदींनी देशाच्या विविध भूमिका आपल्या भाषणात प्रभावीपणे मांडल्या