कोल्हापूर प्रतिनिधी
कोरोनाच्या काळात कोल्हापुरातून सुटणाऱ्या ज्या रेल्वेगाड्य़ा बंद केल्या होत्या, त्या तातडीने सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी अरिहंत जैन फौंडेशनच्या वतीने रेल्वेमंत्री, रेल्वेराज्यमंत्री यांच्यासह दक्षिण महाराष्ट्रातील सर्व खासदारांकडे करण्यात आली आहे. फौंडेशनचे अध्यक्ष जयेश ओसवाल यांनी या संदर्भातील मागण्या आणि समस्या मांडणारे निवेदन मंत्र्यांसह खासदारांना पाठविले आहे. खासदार धैर्यशील माने यांची भेट घेऊन त्यांनाही रेल्वेचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आवाहन केले आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह खासदार संजय मंडलिक, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार संजयकाका पाटील यांना निवेदनात कोल्हापूरसंदर्भातील विविध मागण्या करण्यात आल्या असून इतर समस्याही मांडल्या आहेत. त्या विषयी माहिती देताना फौंडेशनचे अध्यक्ष जयेश ओसवाल म्हणाले, कोरोनाच्या काळात काही रेल्वे गाडय़ा बंद झाल्याने त्याचा परिणाम कोल्हापूर जिल्हय़ातील उद्योग, व्यापार, पर्यटनावर झाला आहे. पर्यटनावर आधारित हॉटेल, रिक्षा, ट्रव्हल एजन्सी आदी छोट्य़ा मोठय़ा इतर व्यवसायांना फटका बसला आहे. त्यामुळे बंद केलेल्या रेल्वे गाडय़ा तातडीने सुरू करण्यास प्राधान्य द्यावे, अशी आमची प्रमुख मागणी आहे. त्याचबरोबर रेल्वेगाडय़ांची वेळ वाढविणे, मार्गात बदल करणे आदी मागण्या केल्या आहेत. निवेदन सादर करताना नरेंद्र ओसवाल, दिलीप गुंदेशा, वनेचंद ओसवाल, शैलेश ओसवाल आदी उपस्थित होते.
प्रमुख मागण्या अशा
-कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर सुपरफास्ट (दुरांतो) एक्स्प्रेस सुरू करावी.
-आठवडय़ातून एकदा सुटणारी कोल्हापूर-अहमदाबाद एक्स्प्रेस आठवडय़ातून तीन वेळा सोडावी.
-कोल्हापूर-अहमदाबाद एक्स्प्रेस राजस्थानच्या आबु रोडपर्यंत सोडावी.
-कोल्हापूर-बेंगळूर रानी चन्नम्मा एक्स्प्रेस सध्या मिरजेतून सुटते, ती पूर्वी प्रमाणे कोल्हापुरातून सोडावी.
-कोरोना काळात बंद केलेल्या सर्व रेल्वेगाडय़ा तातडीने सुरू कराव्यात.
-पुण्यातून भारतातील इतर शहरात जाणाऱया दूरपल्ल्याच्या रेल्वेगाडय़ा कोल्हापुरातून सोडाव्यात.
-कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्यात यावे.
-कोकण रेल्वेला कोल्हापूर जोडावे, ही जुनी मागणी पूर्ण करावी.
-कोरोना काळात बंद केलेल्या सुविधा तातडीने सुरू कराव्यात.