दिल्ली/प्रतिनिधी
कोविड-१९ लॉकडाऊनदरम्यान खादी ग्रामोद्योगाला रेल्वेकडून मिळालेल्या ४९ कोटी रुपयांच्या खरेदी ऑर्डरमुळे खादी कारागीरांना मोठे प्रोत्साहन आणि खादी उद्योगाला गेल्या वर्षभरात मोठी चालना मिळाली आहे. कोविड-१९ मुळे टाळेबंदीचा परिणाम झालेल्या गेल्या वर्षभराच्या कालावधीत भारतीय रेल्वेकडून ४८.९०कोटी रुपयांची मोठी खरेदीची ऑर्डर मिळाली. रेल्वेने केवळ डिसेंबर २०२० पर्यंत ८.४८ कोटी रुपयांचा माल खरेदी केला. यामुळे रोजगार वाढलाच याशिवाय कसोटीच्या या कोविडकाळात खादी कारागीरांना उत्पन्न मिळाले.
भारतभरात पसरलेल्या ८२ खादी संस्थांमधील नोंदणीकृत कारागीरांना भारतीय रेल्वेकडून मिळालेल्या खरेदी ऑर्डरचा थेट फायदा झाला.
मे-२०२० ते डिसेंबर २०२० (२१ डिसेंबरपर्यंत)या कालावधीत, भारतीय रेल्वेने ४८.९० कोटी रुपयांचा खादीमाल खरेदी केल्यामुळे या कोरोना महामारीच्या काळात खादीचे उद्योग टिकून राहू शकले.
खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या कारागीरांकडून मोठी खरेदी करून त्यांना आधार दिल्यामुळे आयोगाचे अध्यक्ष विनयकुमार सक्सेना यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे आभार मानले.
थेट खरेदी करून खादीला आधार देण्याव्यतिरिक्त रेल्वेने खादी कारागीरांना उपयुक्त ठरतील अशी धोरणेही राबवली. अशाच एका धोरणानुसार, ४०० रेल्वे स्थानकावर रेल्वेने प्रवाशांना अन्न व पेय विक्रीसाठी फक्त मातीच्या भांड्यांचा वापर करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे खादी ग्रामोद्योगच्या कुंभार सशक्तीकरण योजनेतून प्रशिक्षण घेतलेल्या कुंभारांना मोठे प्रोत्साहन मिळाले.