मराठीत एक म्हण आहे ‘गावाचं एक तर बुवाचं एक,’ आपल्याकडे तऱहेतऱहेचे बुवा आहेत. या बुवांचे रंग वेगळे, हेतू वेगळे, व्यवहार वेगळे आणि झेंडे वेगळे पण हेतू एकच. भरीसभर या बुवांचे राजकारण, स्टंटबाजी, वार-प्रतिवार, राजकीय हिशोब आहेतच आणि या सर्वांना पोषक असा सोशल मीडिया व मीडिया आहेच. गेले काही दिवस विद्यापीठ, मुक्त विद्यापीठ याच जोडीला व्हॉट्स ऍप विद्यापीठ हा शब्द रुढ झाला आहे. कोरोना संकट उग्र रूप धारण करत आहे आणि हे व्हॉट्स ऍप विद्यापीठ जोरात आहे. जो तो जमेल तसे मार्गदर्शन करतो आहे. घरात कोंडले गेलेले लोक व्हॉट्स ऍप विद्यापीठाच्या स्वयंघोषित पदव्या घेऊन टाईमपास करत गोष्टी फॉरवर्ड करत आहेत आणि मंडळी त्यास बळी पडत आहेत. एकीकडे हे सुरू असताना राजकीय पक्ष, नेते, संघटना आणि धार्मिक संघटना यांचे सोशल मीडिया सेल लोकांच्या मनावर काही बिंबवण्याचा प्रयत्न करत आहेत. खरे तर कोरोना संकट विश्वाच्या नरडीवर आले आहे आणि भारत याला बळी पडला आहे. जगात जितकी रुग्णसंख्या आहे त्यामध्ये भारतातील रुग्णसंख्या दोन नंबरची आहे. जगात या महामारीने 2 कोटी 70 लाख लोकांना ग्रासले. त्यापैकी 1 कोटी 90 लाख बरे झाले पावणे नऊ लाख लोक मृत्युमुखी पडले. भारतातही सुमारे 40 लाख रुग्ण आणि 69 हजार बळी अशी आकडेवारी आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र हे जणू हॉटस्पॉट झाले आहेत आणि त्यात पुणे, कोल्हापूर, सांगली वगैरे भागात कहर आहे. देशात अनलॉकचे वारे वाहते आहे जोडीला अर्थव्यवस्था सुरळीत व्हावी म्हणून प्रयत्न होत आहेत. पण असे प्रयत्न, घोषणा, लस येणार वगैरे हालचाली कोरोना दहशत आणि तांडव रोखू शकलेल्या नाहीत वा जनसामान्यांची भीती कमी करु शकलेल्या नाहीत. ‘भय इथले संपत नाही’ हेच खरे. जगाच्या तुलनेने भारताचा रिकव्हरी रेट, मृत्यूदर वगैरे बरा असला तरी कोरोनाचा थरकाप, रक्त व स्वॅब टेस्टिंगसाठीच्या रांगा, गावोगावी अपुरी पडत असलेली स्मशान व्यवस्था सर्वांचा थरकाप उडवत आहे. ‘बेड देता का बेड’ म्हणत हिंडणारे गंभीर रुग्ण हे विदारक चित्र अनेक शहरात आहे. विधिमंडळ सभापतीपासून अनेक आमदार व मंत्री कोरोना पेशंट आहेत. जी अवस्था महाराष्ट्र विधानसभेची तीच अवस्था थोडय़ाफार फरकाने संसदेची आहे. तेथेही कोरोनाने अनेकांचा गळा आवळला आहे. संसदीय लोकशाहीत अधिवेशन,चर्चा यांना महत्त्व आहे. असलेच पाहिजे पण देशाची, सदस्यांची स्थिती पाहता या सर्व गोष्टीवर यंदा फेरविचार झाला पाहिजे. जग आणि महाराष्ट्र या महामारीने त्रस्त असताना मुंबईत आणि इलेक्ट्रॉनिक मीडियात काय सुरू आहे हे बघणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच ‘गावाचे एक तर बुवाचे एक’ याचे स्मरण झाले. या मीडियाचा आणि संबंधितांचा फोकस कोरोनावरुन सुशांतची आत्महत्या, चौकशी आणि आता कंगना व शिवसेना नेते संजय राऊत यांची मुक्ताफळे इथपर्यंत आला आहे. लोकशाहीने मत मांडण्याचा अधिकार दिला आहे. पण काळ, वेळ, प्रसंग लक्षात घेऊन बोलले पाहिजे. सुशांत व कंगना प्रकरणातील टीकाटिप्पणी, स्टंटबाजी लोकांच्या जीवन मरणाच्या प्रश्नावरचा फोकस दूर करण्याचा प्रयत्न म्हणून गणली जाते आहे, तशी त्यावर टीका केली जात आहे. कोरोनामुळे उद्योग अडचणीत आहेत. अनेकांचे स्थलांतर झाले, नोकरी गेली. ज्यांची टिकली त्यांना कमी पगारात राबवून घेतले जाते. शाळा, शिक्षण, परीक्षा, अर्थव्यवस्था, देशाच्या सीमा अडचणीत आहेत पण याकडे कानाडोळा करून कंगनाचे मुंबई आगमन, तिचा निषेध वा समर्थन, कुणाचा बाप, कुणाची अस्मिता, बोलवता धनी, करविता धनी वगैरे सुरुच आहे. ड्रग माफिया, गांजेकस कलाकार, बॉलीवूड आणि राजकारणी, बॉलीवूडमधील पैसा वगैरे अनेक पदर या गोष्टीला आहेत. सरकारी पातळीवर व पोलीस सीबीआय वगैरे एजन्सीमार्फत त्याची चौकशी होईल, संबंधिताचे मुखवटे फाडले पाहिजेत पण आज फोकस मात्र कोरोनायुद्ध आणि अर्थव्यवस्था सबलीकरण यावर असला पाहिजे. दुर्दैवाने तो हालताना दिसत आहे आणि त्यात महाराष्ट्रातले काही राजकीय पक्ष, प्रवक्ते, मीडियाकर्मी यांनी आघाडी घेतली आहे, हे शोभादायक नाही. रोम जळत असताना फिडल कुणी वाजवत होते आणि देश संकटात असताना मोराशी कोण खेळत होते याची चर्चा करणाऱया सर्वांनी या संकटात मी काय करत होतो. माझा पक्ष काय करत होता याचे आत्मचिंतन केले पाहिजे आणि कोरोना लढा की कंगना विरोध, कोरोना लढा की सुशांत आत्महत्या यात कशाला आणि कुणाच्या स्टंटबाजीला महत्त्व द्यायचे हे ठरवायला हवे. या महामारीने मानव समूहाला मोठा फटका दिला आहे. शतकानुशतके तो स्मरणात राहिल पण यातून सावरायला काही वर्षे जातील. कोरोनावरील लस चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत. लस उत्पादन भारतात मोठय़ा प्रमाणात होणार आहे. पुण्यात होणार आहे,त्यामुळे भारतीयांना, मराठी जनतेला ही लस लवकर मिळेल पण सर्वात प्रथम ती अमेरिकेत आणायची, या लसीवर निवडणूक जिंकायची असे मनसुबे ट्रम्प यानी आखले आहेत. राजकारण म्हणून ते चुकीचे नाही पण ही लस नोव्हेंबरमध्ये येईल आणि पुढील सहा महिन्यात सर्वांपर्यत उपलब्ध होईल. ओघाने आगामी काही महिने कसोटीचे आहेत. या काळात जग कसे वागले, नेते, राजकीय पक्ष कसे वागले आणि व्यक्तीगत आपण कसे वागलो यांची चिकित्सा गरजेची आहे. सारे संकुचित स्वार्थ बाजूला ठेवून जनकल्याण हेच महत्त्वपूर्ण मानले पाहिजे. राजकारण होत राहील, ड्रगमाफिया आदी गुन्हेगारी नवी नाही. पोलीस पाळेमुळे खणून काढतील, गुन्हेगारांना शिक्षा होईल. पण या काळात मी काय केले हे स्वतःला जरुर विचारा व चांगल्याची पाठराखण करा, त्यातच हित आहे. कोरोना का कंगना यामध्ये लोकहित डावलून चालणार नाही.
Previous Articleपाककृती अशी असते
Next Article सांगली जिल्हय़ात 34 जणांचा मृत्यू, नवे 763 रूग्ण
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.