वार्ताहर / राजापूर
कोरोनाबाधित व्यक्तीवर नियमांचे पालन न करता अंत्यविधी केल्याप्रकरणी कोंढेतड येथील सातही संशयित आरोपींची नावे निष्पन्न झाला. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे. लवकरच त्यांची कोरोना चाचणी करून अटक केली जाणार आहे, अशी माहिती राजापूर पोलिसांनी दिली.
राजापूर शहरानजीकच्या कोंढेतड येथील एका कोरोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह उघडून त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी सातजणांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यांची नावे निष्पन्न झाली आहेत. रिजवान अकबर सारंग, इरफान रशीद काझी, इक्बाल इस्माईल बलबले, फकीर जाफर हवालदार, मतीन शब्बीर हवालदार, अजीम इब्राहीम जैतापकर, रशिद अलिमियॉ काझी (सर्व रा. कोंढेतड) अशी त्यांची नावे आहेत. यांना पोलिसांनी कोरोना प्रतिबंधक कायद्याचा भंग केल्याप्रकरणी 41/1 नोटीस बजावली आहे. हे सर्व जण त्या कोरोनाबाधित मृत व्यक्तीच्या थेट संपर्कात आल्याने त्यांची कोरोना चाचणी करून अटक व अन्य कायदेशीर बाबींची पूर्तता केली जाणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दबाव टाकणारे लोकप्रतिनिधी, नगरपरिषदेवरही कारवाई व्हावी
भाजपा तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांची मागणी
शहरातील कोंढेतड येथील कोरोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढून त्याच्यावर धार्मिक विधीने अंत्यसंस्कार करणे हा प्रकार अत्यंत गंभीर व धक्कादायक आहे. मात्र या प्रकरणात स्थानिक लोकप्रतिनिधी व नगरपरिषद प्रशासनाने दाखवलेला बेजबादारपणा कारणीभूत आहे. ज्यांनी मृतदेह राजापुरात आणण्याचा अट्टहास केला ते लोकप्रतिनिधी आणि नगरपरिषद प्रशासन यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी भाजपा तालुका अध्यक्ष अभिजित गुरव यांनी केली आहे.
या कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृतदेहावर कोरोनाच्या नियमांचे पालन करून अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे तहसीलदार प्रतिभा वराळे यांच्यापुढे सांगणाऱया नगराध्यक्ष ऍड. जमीर खलिफे या अशा प्रकारे नियम धाब्यावर बसून अंत्यविधी केले जात असल्याची माहिती असूनही ते मुग गिळून गप्प का राहिल. मृतदेह राजापुरात आणण्यासाठी दबाव टाकणाऱया लोकप्रतिनिधेंचा शोध घेऊन कारवाई करावी. मृतदेह दफनविधीसाठी राजापुरात आणण्यासाठी राजापूर नगरपरिषदेने ना हरकत दाखला कसा आणि कोणाच्या दबावाखाली दिला, याचीही चौकशी होणे आवश्यक आहे. तसेच या बाबत नगरपरिषद प्रशासनाने अगोदरच तक्रार का केली नाही, व्हीडिओ व्हायरल होण्याची वाट का पाहिली, हा व्हीडिओ व्हायरल झाला नसता तर हे प्रकरण दाबलेच गेले असते ना, असे काही प्रश्न अभिजित गुरव यांनी उपस्थित केले आहेत.