प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हय़ातील अनेक नागरिक कोरोनाची लक्षणे असतानाही दुर्लक्ष करत असल्याने कोरोनाचा फैलाव जास्त होत आह़े यामुळे नागरिकांनी पुढाकार घेऊन टेस्ट करुन घेणे गरजेचे आहे. जर कोणत्याही गावात किंवा शहरात कोरोनाचे लक्षण असलेले लोक टेस्टिंगसाठी विरोध करत असतील तर अशा लोकांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ड़ॉ इंदुराणी जाखड यांनी दिला आह़े
राज्यात अनलॉक 5 टप्प्यांमध्ये जाहीर झाले आहे. तथापि आपला रत्नागिरी जिल्हा 4 थ्या टप्प्यात समाविष्ट करण्यात आला आहे. सध्याच्या घडीला रत्नागिरीचा कोरोनाचा पॉझिव्हिटी रेट 14.12 इतका आहे. त्यामुळे आता हे प्रमाण कमी करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने दमदार पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. यात खालील उपाययोजना राबवण्यात येत आहेत. जास्तीत-जास्त टेस्टिंग करुन टेस्टिंगची संख्या वाढवणे, हे आह़े कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जास्तीत-जास्त लोकांनी स्वतः पुढे आले पाहिजे. स्वतःसहीत आपल्या जवळच्या लोकांनाही धोका होणार नाही. यामुळे अदृश्य केसेस समोर येतील. यामुळे होणारा फैलाव आटोक्यात येईल. तसेच पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना कोणत्याही परिस्थितीत संस्थात्मक विलगीकरणात ठेवल्याने ज्यामुळे त्यांच्याद्वारे आणखी फैलाव होणार नाही. यामध्ये 60 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱया ज्येष्ठ लोकांना संस्थात्मक विलगीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या निर्देशानुसार एकूण 5 निकषात बसणाऱया लोकांना स्टॅम्पिंग करुन गृहविलगीकरणात राहता येईल. यामुळे निश्चितच फैलाव रोखण्यास मदत होईल, असे डॉ. जाखड यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार ग्रामविकास विभागाद्वारे ग्रामीण भागातील प्रत्येक गाव कोरोनामुक्त करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या अख्यात्यारित येणाऱया सर्व ग्रामपंचायतींना दिलेले आहेत. साहजिकच यामध्ये ग्रामसेवकांची भूमिका मोठी असणार आहे. सर्व ग्रामपंचायतींनी कोरोनावर मात करण्यासाठी जिद्द उत्पन्न व्हावी, यासाठी कोवीड-19 व्यवस्थापनासाठी कोरोनामुक्त गाव स्पर्धा योजना जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये ग्रामपंचायत स्तरावर 5 पथके काम करतील. यात कुटुंब सर्वेक्षण, विलगीकरण कक्ष, वाहनचालक पथक, कोवीड हेल्पलाईन पथक व लसीकरण पथक याचा समावेश होतो. या पुरस्कार योजनेत प्रत्येक गावाने कोरोनाला रोखण्यासाठी प्रोत्साहान देण्यात आले आहे. साहजिकच यामध्ये ग्रामपंचायत व ग्रामसेवकांचा सहभाग अतिशय महत्वाचा ठरतो. जेणेकरुन प्रत्येक गाव कोरोनामुक्त होण्यासाठी मदत होईल, असे डॉ. जाखड यांनी म्हटले आहे.
पॉझिटिव्हिटी दर कमी होण्याची अपेक्षा
आपल्या जिल्हय़ात कोरोना पॉझिटिव्हिटी दर कमी करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक निर्बंधांची अंमलबजावणी सुरु तर आहेच. शिवाय विनाकारण फिरणारे किंवा मास्क न वापरणारे यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मोकाटपणे फिरणाऱयांना पोलिसांद्वारे पकडून दंडात्मक कारवाईसह टेस्टही करण्यात येत आहेत. एकूणच सर्व यंत्रणा समन्वय ठेवून आपल्या जिल्हय़ाचा कोरोना पॉझिटिव्हिटी दर कमी करण्यासाठी झपाटून कामाला लागल्या आहेत. याचा परिणाम म्हणून आपला पॉझिटिव्हिटी दर कमी होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती ड़ॉ जाखड यांनी दिल़ी