24 तासांत अहवाल निगेटीव्हचेही पुन्हा मेसेज : आरोग्य विभागाचा कारभार चव्हाट्यावर
अडीच महिन्यांपूर्वी झाली होती सर्वांची चाचणी
राजेंद्र शिंदे / चिपळूण
कोरोना चाचणीचे अहवाल वेळेत न देणे, चुकीच्या क्रमांकावर देणे असे प्रकार राज्यात नित्याचे असतानाच आता चाचणी न करताही चाचणी केल्याचे मेसेज तब्बल 42 जणांच्या मोबाईलवर आरोग्य विभागाने पाठवले आहेत. यामुळे खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे अडीच-तीन महिन्यांपूर्वी या सर्वांची चाचणी झालेली असतानाच पुन्हा या सर्वांना चाचणीचे मेसेज आल्यानंतर संबंधितांची झोप तर उडालीच, परंतु आरोग्य विभागाच्या कारभारावर जोरदार चर्चाही रंगल्या आहेत.
कोरोनाची चाचणी करायला प्रारंभी नागरिकांची तयारी नव्हती. संसर्गाचे प्रमाण वाढल्यानंतर व काही भागात शासनाने सक्ती केल्याने या चाचण्या वाढल्या. मात्र कोरोना चाचणीच्या अहवालातील सावळा गोंधळ कायम आहे. चाचणीचा अहवाल संबंधिताच्या मोबाईलवर पाठविला जातो, पूर्वीसारखा लेखी अहवाल दिला जात नाही. ऍंटीजेन चाचणीनंतर त्याच ठिकाणी केवळ तोंडी सांगितले जाते.
तालुक्यातील एका कंपनीत परजिल्ह्यातून आलेल्या कामगारांची अडीच महिन्यांपूर्वी कोरोना चाचणी केली गेली. त्यामध्ये काही जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पॉझिटिव्ह आलेल्यांवर उपचारही झाले. निगेटिव्ह अहवाल आलेले कामावर रुजू झाले. मात्र सोमवारी सायंकाळी अचानकपणे तब्बल 42 जणांच्या मोबाईलवर 9 ऑगस्टची तारीख दर्शवून स्वॅब घेतले असून त्याचा अहवाल येईपर्यंत आयसोलेट होण्याबाबत सूचना दिली गेली होती.
कोणतीही चाचणी न करता आरटीपीसीआर केलेल्याचे मेसेज पाहून अनेकांचे धाबे दणाणले. त्यांनी आपापल्या पध्दतीने याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र हाती काहीच लागले नाही. स्वॅबच दिलेले नसल्याने मेसेज चुकीच्या पध्दतीने आल्याचे समजून त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र 24 तासांच्या आतच मंगळवारी सकाळी या सर्वांना त्यांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह असल्याचा मेसेज आला. याची माहिती `तरूण भारत’ला प्राप्त झाल्यानंतर शोध घेण्याचा प्रयत्न केला असता धक्कादायक बाब निदर्शनास आली.
… त्या दिवशी चाचणीच झालेली नाही?
मुळातच ज्या 42 जणांच्या बाबतीत हा प्रकार घडला, त्यांच्या चाचण्या यापूर्वीच झाल्या आहेत. हे गाव सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारित येते. त्या केंद्रात चौकशी केली असता 9 ऑगस्टला तेथे अशा कोणत्याही चाचण्याच झालेल्या नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आरटीपीसीआर चाचणी न करताच पाठवण्यात आलेले मेसेज नेमके कशासाठी, याचा उलगडा झालेला नाही. जेथून मेसेज पाठवले जातात तेथे विचारणा केल्यानंतर त्यांचाही गोंधळ उडाला. हा प्रकार मुळातच गंभीर असून या बाबतची चौकशी झाल्यास सत्य बाहेर येणार आहे. |
रूग्णांकडून चुकीचे नंबर दिले गेल्याची शक्यता
कोरोना चाचणी करताना रुग्णांकडून दिल्या जाणाऱया मोबाईल क्रमांकावर मेसेज पाठवण्यात येत़ो यामध्ये काही चुकीचे नंबर रुग्णांकडून दिले गेले असू शकत़े दरम्यान चाचणी न करता निगेटीव्ह अहवाल पाठवला गेल्याची तक्रार अद्याप आपल्यापर्यंत आलेली नाह़ी – डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्यचिकित्सक, रत्नागिरी |