ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना या जीवघेण्या विषाणूने हाहाकार माजवल्याने चीनच्या वुहानमध्ये अडकून पडलेल्या आणखी 323 भारतीयांना आज विमानाने भारतात आणण्यात आले.
दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानातून आलेल्या प्रवाशांच्या स्क्रीनिंगसाठी डॉक्टरांचे विशेष पथक तैनात होते. वुहानमधून आलेल्या भारतीय नागरिकांना किमान 14 दिवस आयटीबीपी आणि लष्कराच्या केंद्रांमध्ये राहावे लागणार आहे. दिल्लीच्या छावला येथे आयटीबीपी आणि गुरुग्रामच्या मानेसरमध्ये लष्कराच्या कॅम्पमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
शनिवारी सकाळीच 324 भारतीय विद्यार्थ्यांना वुहानमधून विमानाने भारतात आणण्यात आले होते. त्यानंतर आज पुन्हा आणखी 323 भारतीयांना परत आणण्यात आले. यामध्ये 7 मालदीवच्या नागरिकांचाही समावेश आहे.
कोरोना या विषाणूने चीनमध्ये आतापर्यंत 259 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 11 हजार 791 जणांना या विषाणूची लागण झाली आहे. या जीवघेण्या विषाणूची चीनमध्ये शिकणाऱया भारतीय विद्यार्थ्यांना लागण होऊ नये, यासाठी त्यांना भारतात परत आणण्यात येत आहे.