ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
जीवघेण्या कोरोना विषाणूने हाहाकार माजवल्याने चीनच्या वुहानमध्ये अडकून पडलेल्या 324 भारतीय विद्यार्थ्यांना विमानाने भारतात आणण्यात आले आहे. आज सकाळी सातच्या सुमारास एअर इंडियाचे हे विमान दिल्लीत दाखल झाले आहे.
कोरोना या विषाणूने चीनमध्ये आतापर्यंत 259 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 11 हजार 791 जणांना या विषाणूची लागण झाली आहे. या जीवघेण्या विषाणूची चीनमध्ये शिकणाऱया भारतीय विद्यार्थ्यांना लागण होऊ नये, यासाठी त्यांना परत भारतात आणण्याची परवानगी चीन सरकारकडे करण्यात आली होती. त्यानंतर या विद्यार्थ्यांना विमानाने भारतात आणण्यात आले.
या 324 भारतीय विद्यार्थ्यांपैकी बहुतांश लोक हे मेडिकलचे विद्यार्थी आणि संशोधक आहेत. त्यांना भारतात परत आणण्यासाठी शुक्रवारी एअर इंडियाचे विशेष विमान रवाना करण्यात आले होते. ते आज सकाळी सातच्या सुमारास दिल्लीत दाखल झाले. विमानामध्ये दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयातील 5 डॉक्टरांचे पथक आणि पॅरा मेडिकल स्टाफ उपस्थित होता. या कर्मचाऱयांकडे आवश्यक ती औषधे, मास्क, पाकीटबंद भोजन उपलब्ध होते. त्याशिवाय सुरक्षा अधिकाऱयांचे एक पथकसुद्धा विमानात तैनात करण्यात आले होते.