ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे जिल्हयातील ग्रामीण व शहरी भागातील कोरोना रुग्णांची सद्याची संख्या पाहता या आठवडयातील निर्बंधच पुढील आठवडयात कायम राहतील. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता नागरिकांनी अधिक जबाबदारीने वागावे, असे प्रतिपादन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील कौन्सील हॉल येथे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हयातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी वळसे पाटील बोलत होते. यावेळी खा. गिरीश बापट, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, वंदना चव्हाण, महापौर मुरलीधर मोहोळ, जि.प.अध्यक्षा निर्मला पानसरेसह अनेक विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले, जिल्हयात ग्रामीण व शहरी भागात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. तसेच नियोजन करुन पेसा भागातील नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करावे. सुपर स्प्रेडर, दुकानदार, मार्केटमधील व्यवसायिक यांची कोरोना चाचणी करण्याचे प्रमाण वाढविण्यात आलेले आहे. तसेच दर पंधरा दिवसांनी रॅपिड ॲन्टीजन टेस्ट ( RAT) बंधनकारक करण्यात आलेली आहे. दिव्यांग नागरिकांचे लसीकरण सुरु आहे. संभाव्य तिस-या लाटेचा विचार करता प्रशासनाने तयारी केलेली आहे. नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रशासनाने म्यूकरमायकोसीस रुग्णांची जास्तीत जास्त काळजी घेण्याची गरज आहे. डेल्टा प्लसचा धोका लक्षात घेता प्रशासनाने व नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे. पर्यटनाला व सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळावे. विवाह समारंभात नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेता, हॉटेल व्यवस्थापन व मंगल कार्यालयांनी प्रशासनाच्या नियमांची अंमलबजावणी करावी. जे नियमांची अंमलबजावणी करणार नाही त्यांच्यावर पोलिस प्रशासनाने दंडात्मक कारवाई करावी.
तसेच तिस-या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालये पंधरा जुलै पर्यंत बंदच ठेवण्यात येतील. सद्या हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांचे बिल व औषधांचे बिल या विषयी तक्रारी येतात. त्यामुळे प्रशासनाने काटेकोरपणे लेखापरिक्षण करण्याच्या सुचनाही वळसे पाटील यांनी दिल्या.