ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्येचे प्रमाण काही प्रमाणात कमी होताना दिसत असले तरी मृतांची वाढती संख्या चिंताजनक आहे. कोरोना आकडेवारी बाबत केंद्राकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, मागील 20 दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. 3 मे रोजी देशात सक्रिय रुग्णांचा दर 17.13 % इतका होता. यामध्ये आता घट झाली असून तो 11.12% इतका झाला आहे. तर सद्य स्थितीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87.76 टक्के इतके असून देशातील 2 कोटी 30 लाख पेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
लव अग्रवाल यांनी सांगितले की, देशातील केवळ 8 राज्यांमध्ये 1 लाख पेक्षा अधिक रुग्ण आहेत. तर 50 हजार ते 1 लाख रुग्ण संख्या देखील 8 राज्यांमध्ये आहे. तर 20 राज्यात आणि एका केंद्र शासित प्रदेशात 50 हजार पेक्षा कमी ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. पुढे ते म्हणाले, देशातील 6 राज्यांत मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, युपी, पंजाब आणि दिल्ली यांचा समावेश आहे.
- अनेक राज्यातील पॉझिटिव्ह दरात घट
देशात18 राज्ये अशी आहेत जिथे कोरोना संसर्गाचा दर 15 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. तर 5 ते 15 टक्के पॉझिटिव्हिटी असणारी 14 राज्ये आहेत. यासोबतच 5 टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेट असणारी 4 राज्ये आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 18.41 कोटी लसीचे डोस 45 पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना तसेच आरोग्य कर्मचारी आणि कोविड योद्ध्यांसाठी सरकार कडून उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी 92 लाख डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
पुढे ते म्हणाले, ब्लॅक फंगससाठी उपयुक्त असलेल्या एमफोटेेरेसिन – बी याचे उत्पादन वाढविण्यावर भर दिला जात आहे. यासाठी अजून 5 कंपन्यांना लायसन्स मिळावे यावर आम्ही काम करीत आहोत.