पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जिल्हाधिकाऱयांसह, जिल्हा पातळीवरील अधिकाऱयांना हाक
प्रतिनिधी / बेंगळूर
कोराना नियंत्रणासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राज्यातील धारवाड, कारवारसह 17 जिल्हय़ांच्या जिल्हाधिकाऱयांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला आहे. यावेळी पंतप्रधानांनी कोरोना नियंत्रणासाठी जिल्हाधिकाऱयांसह जिल्हा पातळीवरील सर्व अधिकाऱयांना फिल्ड कमांडरप्रमाणे काम करण्याची हाक दिली आहे.
पंतप्रधानांनी आयोजिलेल्या बैठकीत बेंगळूरमधील मुख्यमंत्र्यांचे गृहकार्यालय ‘कृष्णा’ येथे येडियुराप्पा, गृहमंत्री बसवराज बोम्माई, मंत्री जगदीश शेट्टर, राज्य सरकारचे मुख्य सचिव पी. रवीकुमार आदी सहभागी झाले होते. बैठकीनंतर बसवराज बोम्माई यांनी पंतप्रधानांशी झालेल्या संवादाची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली. राज्य सरकारचे प्रमुख आदेश स्थानिक पातळीवर जारी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱयांची असून जिल्हय़ातील लोकप्रतिनिधींवर त्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आहे. हे काम केवळ जिल्हाधिकाऱयांचेच नसून जिल्हा पातळीवरील अधिकाऱयांचीही आहे. स्थानिक पातळीवर काही बदल करून कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजनांची परिणामकारकपणे अंमलबजावणी करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पंतप्रधानांनी केल्याचे बोम्माई म्हणाले.
ग्रामीण भागात आणि उपनगरांमध्ये कोरोनाच व्यापक प्रमाणात फैलाव होत आहे. त्यावर नियंत्रण आणण्याचे मोठे आव्हान समोर आहे. याकामी ग्राम पंचायत पातळीवर कृतीदल स्थापन करावी. स्त्रीशक्ती, महिला आणि युवक संघटनांची मदत घ्यावी. कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांवर लक्ष ठेवून ठोस उपाययोजना केल्या तर त्यांना संसर्ग नियंत्रणात येणे शक्य आहे. या कामात लोकप्रतिनिधींनी पक्षभेद विसरून काम केले तर कोरोनाविरुद्धच्या लढय़ात यश मिळणे शक्य आहे, असा संदेश पंतप्रधान मोदींनी दिल्याचे ते म्हणाले.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेचा लहान मुलांना अधिक परिणाम होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये कोरोनाविषयी स्थानिक भाषेत कार्टुन, लेखन, गोष्टी आदी माध्यमांद्वारे जागृती करण्याचे कार्यक्रम आयोजित करण्याची सूचना पंतप्रधानांनी राज्य सरकारला दिली आहे. मुलांच्या आकलन क्षमतेचा विचार करून त्या स्तरावर जागृतीपर कार्यक्रमांची आखणी सूचना पंतप्रधानांनी दिली आहे.