80 टक्के लोक मास्क वापरत नसल्याचे निरीक्षण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असताना जनतेमध्येच नियम पाळण्याबाबत अनास्था दिसून येत असल्याने कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. सुमारे 80 टक्के लोक मास्क वापरत नसल्याचे दिसून आले आहे. कोरोनापासून बचावासाठी सरकारने जारी केलेले निर्देश न पाळणे चिंताजनक असल्याचे सांगत शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.
कोरोना रोखण्यासाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना, नियमावली जारी केली आहे. तरीही देशभरात कोरोनाचे संक्रमण वाढत असून जनतेमध्ये याबाबत गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. ठिकठिकाणी मोर्चे, मिरवणुका काढण्यात येत आहेत. तर सुमारे 80 टक्के लोक मास्क वापरत नसल्याचे दिसून येत आहे. जे मास्क वापरतात, ते त्यांच्या गळय़ाभोवतीच लपेटलेले असते. जनतेने योग्यप्रकारे मास्क वापरावेत. तसेच कोरोना रोखण्याबाबत सरकारने आणि आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्याची गरज न्यायालयाने व्यक्त केली.
जनतेत कोरोनाबाबत निर्देशांचे पालन करण्याची इच्छाशक्ती नसून अनास्था दिसत आहे. हे चिंताजनक असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेच्या तुलनेत अधिक तीव्र असून कोरोनाचे संक्रमण झपाटय़ाने पसरत असल्याचे केंद्राने न्यायालयात सांगितले.
10 राज्यांमध्ये कोरोना झपाटय़ाने फैलावत असून 77 टक्के रुग्ण या राज्यातील असल्याचेही केंद्राने सांगितले. त्यावर न्यायालयाने कोरोनाबाबतच्या नियमावलीची कठोरतेने अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त केली. तसेच कोरोना रोखण्यासाठी राज्यांनी पुढाकार घ्यावा, असे सांगत या संकटाच्या काळात राजकारण करू नये. एकत्र येत या संकटाचा मुकाबला करण्याची गरज न्यायालयाने व्यक्त केली आहे.
आगीच्या घटनेबाबत केंद्राला फटकारले
गुजरात-राजकोटमध्ये कोविड रुग्णालयाला लागलेल्या आगीबाबतही न्यायालयाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. अशा घटना घडू नयेत यासाठी केंद्राने पावले उचलायला हवीत, असे सांगितल्यानंतर केंद्रीय गृह सचिव देशभरातील सरकारी रुग्णालयातील अग्निसुरक्षेबाबत बैठक घेतील आणि योग्य ते निर्देश देतील, असे केंद्र सरकारच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.