जिल्हाधिकाऱयांची महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाला सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
17 जानेवारी रोजी हुतात्मादिन आहे. हुतात्मादिन पाळण्यासाठी परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱयांची भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकाऱयांनी कोरोनाचे नियम पाळत व साध्या पद्धतीने हुतात्मा दिन पाळण्याची सूचना केली आहे.
कोरोना असल्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाने सर्वच कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आणि मोजक्मयाच्या व्यक्तींच्या उपस्थितीत साजरे केले आहेत. तेव्हा आपणही अभिवादन कार्यक्रम साधेपणाने करावा. यावेळी सामाजिक अंतर, मास्क याचा वापर करावा, असे आवाहनदेखील त्यांनी केले
आहे.
मोर्चा, मिरवणूक, सभा अशा गोष्टी टाळा, असेही त्यांनी सांगितले. यावर म. ए. समितीच्या शिष्टमंडळानेही आम्ही सर्व नियम पाळून हा कार्यक्रम करू, असे स्पष्ट केले. ज्या तरुणांना अटक करण्यात आली आहे, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत, त्यांची तातडीने सुटका करावी, अशी मागणीही शिष्टमंडळाने केली आहे. अल्पसंख्याक प्रश्नाबाबतही यावेळी चर्चा केली आहे. दीपक दळवी, मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचा या चर्चेमध्ये सहभाग होता.
पोलिसांनी हुतात्मादिनाच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली
दरम्यान 17 जानेवारी रोजी होणाऱया हुतात्मा दिनाच्या अभिवादन कार्यक्रमाला पोलीस आयुक्तांनी परवानगी नाकारली आहे. कोरोना नियमावलीचे कारण देत पोलीस आयुक्तांनी एकत्र येण्यावर व फेरी काढण्याला परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी जरी परवानगी नाकारली तरी म. ए. समिती मात्र हुतात्म्यांना अभिवादन करण्यावर ठाम आहे. कोणत्याही परिस्थितीत हुतात्म्यांना अभिवादन करणारच अशी भूमिका म. ए. समितीने घेतली आहे.
सीमाप्रश्नासाठी अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे. या हुतात्म्यांचे स्मरण व्हावे यासाठी प्रतिवषी बेळगावसह शहापूर, कंग्राळी येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम होतो. शहरात हुतात्मा चौकापासून, किर्लोस्कर रोड, अनसुरकर गल्ली, तेथून पुन्हा हुतात्मा चौकामध्ये फेरी काढून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येते. हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाची आठवण पुढील पिढीला रहावी, या उद्देशाने सीमाभागात हुतात्मादिन गांभिर्याने पाळला जातो. परंतु हुतात्मा दिनाला आडकाठी घालण्याचा प्रयत्न मागील काही वर्षांपासून प्रशासनाकडून सुरू आहे. हुतात्म्यांना अभिवादन करणेही बेकायदेशीर ठरविले जात आहे.
मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या नियमावलीचे कारण देत प्रशासनाकडून हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने हुतात्मा दिनाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला दिली होती. परंतु पोलीस आयुक्तांनी कोरोना नियमावलीचा आधार घेत फेरी काढण्यास परवानगी नाकारली आहे. अशा आशयाचे पत्र मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी तसेच इतर समिती नेत्यांना पाठविण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारची गर्दी होईल अशा कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आल्याचे पोलिसांनी कळविले आहे.
हुतात्म्यांना अभिवादन होणारच
एकीकडे हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारत असताना दुसरीकडे मात्र पाच राज्यांच्या निवडणुका घेण्यात येत आहेत. प्रशासनाच्या या दुटप्पी भूमिकेमुळे सीमावासियांमध्ये प्रचंड नाराजी आहे. कोणत्याही परिस्थितीत हुतात्म्यांना अभिवादन करणारच अशी भूमिका मध्यवर्ती म. ए. समितीने घेतली आहे. सोमवार दि. 17 रोजी सकाळी 9 वा. सीमावासियांनी हुतात्माचौक येथे उपस्थित रहावे असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समितीने केले आहे.