प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हय़ात सर्वत्र 7 ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आह़े 9 दिवस चालणाऱया या उत्सवावर यावर्षीही कोरोनाने निरुत्साह पसरवला आहे. असे असूनही जिह्यात 30 हजाराहून अधिक ठिकाणी खासगी घटस्थापना होणार आहेत. याशिवाय 447 ठिकाणी देवींची प्रतिष्ठापना होणार आह़े रास दांडिया गरबा नसल्याने तरूणाईचा मात्र हिरमोड झाला आह़े
गतवर्षी जिह्यात 364 ठिकाणी देवींच्या मूर्ती प्रतिष्ठापना, 92 ठिकाणी फोटोपूजन, 37 हजार 559 ठिकाणी खासगी तर 249 ठिकाणी सार्वजनिक घटस्थापना करण्यात आली होत़ी यावर्षी 395 सार्वजनिक तर 52 खासगी ठिकाणी देवींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आह़े याशिवाय 30 हजार 250 खासगी तर 447 ठिकाणी सार्वजनिक घटस्थापना करण्यात येणार आहे.
नवरात्रोत्सव जवळ येताच जागोजागी देवीच्या पूजा, स्थापनेसाठी मंडप उभारण्याची तयारी सुरू होते. अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना केली जाऊन मडक्यामध्ये धान्य पेरले जाते. त्यावर अखंड नंदादीप लावला जातो. रोज फुलांची माळ, सकाळ-संध्याकाळ आरती अशाप्रकारे घरोघरी घटस्थापना होत असते. दुर्गामातेच्या विविध रूपातील मूर्ती बनवण्याच्या मूर्तीशाळांतूनही मोठी लगबग असते. देवींच्या मूर्त्या वाजतगाजत उत्सवा ठिकाणी मिरवणुकांनी येतात, उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, स्पर्धांचेही नियोजनाची धावपळ सुरू असते. नऊ दिवस दांडिया-गरबा कार्यक्रमाचीही रंगत असते. मात्र यावर्षी दांडिया स्पर्धेशिवाय नवरात्र उत्सव साजरा करावा लागणार आहे. नवरात्रोत्सवाला आता एकच दिवस बाकी राहिला आहे. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवापाठोपाठ नवरात्रोत्सव साजरा करण्यावरही बंधने आली आहेत. नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी शासनाने जारी केलेल्या नियमांच्या अधीन राहून यावर्षी रास, गरबा आणि दांडिया स्पर्धेशिवाय नवरात्रोत्सव साजरा करावा लागणार आहे.