बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी कमी होत आहे. दरम्यान, राज्यातील ११ जिल्ह्यात २१ जूनपर्यंत लॉकडाऊन कायम आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने मुख्यमंत्री राज्यातील निर्बंध आणखी शिथिल करण्याच्या तयारीत आहेत. मुख्यमंत्री याबाबत आज निर्णय घेणार आहेत.
२१ जूननंतर राज्यात कोविडवरील अंकुशांना आणखी शिथिल करण्याचा निर्णय शनिवारी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत घेण्यात येईल. राज्यातील कोरोना परिस्थिती सुधारत आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी भविष्यात तिसऱ्या लाटेची शक्यताआहे पण असे असूनही आपल्याला थोडी विश्रांती द्यावी लागेल. आम्ही बैठकीत या विषयावर चर्चा करू, असे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, राज्यात दुसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग वेगाने झाला. रुग्णांची संख्या राज्यात दिवसेंदिवस वाढत होती. रुग्णांना उपचारासाठी बेड, ऑक्सिजन मिळणे अवघड झाले होते. दरम्यान राज्य सरकारने वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन राज्यात पूर्ण लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊन वेळी राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले. यामुळे कोरोना रुग्णवाढीला आळा बसला. सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून राज्यात कोरोना सकारात्मकता दरही ५ टक्क्यांच्या खाली आहे. त्यामुळे २१ जूननंतर राज्यात लागू असलेल्या निर्बंधामध्ये आणखी शिथिलता मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री यासंदर्भात आज निर्णय घेणार आहेत.