ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोना विषाणूने दुसऱ्या लाटेत अक्षरशः थैमान घातला आहे. आता तर शहरानंतर कोरोनाने ग्रामीण भागात देखील पाय पसरायला सुरवात केली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक आहे अशा जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 20 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रासह 10 राज्यांतील 54 जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. यावेळी जिल्ह्यांमधील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे तसेच लसीची प्रक्रिया वाढविण्याबाबत चर्चा केली जाणार आहे.
पहिल्या फेरीत 20 मे रोजी उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, पंडिचेरी, राजस्थान, महाराष्ट्र, झारखंड, ओडिशा, केरळ आणि हरियाणा येथील जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश असेल. त्यानंतर नरेंद्र मोदी उर्वरित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.