स्वच्छता संवाद उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी साधला संवाद
प्रतिनिधी/ सातारा
भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील सर्व गावांमध्ये स्वच्छता सातत्य राखणे घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी राज्यस्तरावरून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. राज्यातील प्रत्येक घराला प्रति प्रतिव्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी देण्याच्या योजना राबवल्या जात आहेत. कोरोना महामारी सुद्धा राज्यातील जनतेने मोठय़ा प्रमाणात सहकार्य केल्याने कोरोना परिस्थिती हाताळणे यामध्ये महाराष्ट्र राज्य देशभरात अव्वल ठरले आहे. कुटुंबप्रमुख म्हणून मी राज्यातील सर्व सरपंचांचे मनापासून धन्यवाद करतो कि राज्यातील सर्व सरपंचांनी स्वच्छतेबाबत जागृकता आणि कोरोना उपायोजना यशस्वीपणे राबवल्यामुळे आज महाराष्ट्र राज्य कोरोना मुक्तीकडे वाटचाल करीत आहे. भविष्यामध्ये ही राज्यातील सर्व गावे कचरा मुक्त व प्लास्टिक मुक्त करण्याचे नियोजन सरपंचांनी केले पाहिजे. कोरोना परिस्थितीमध्ये स्वच्छता हे अमृत ठरले आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरपंच स्वच्छता संवाद उपक्रमामध्ये राज्यातील सर्व सरपंचांना संबोधताना केले. सातारा जिल्हय़ाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी व सरपंचांतर्फे ऑनलाईनच्या माध्यमातुन संवाद साधण्यात आला.
यावेळी राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने राज्यातील सर्व सरपंचासाठी सरपंच स्वच्छता संवाद उपक्रम आयोजित केला होता. पाणी पुरवठा विभागामार्फत पाणी व स्वच्छता संदर्भात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने प्रत्येक घरांना नळजोडणी व प्रति माणसी 55 लिटर शुद्ध पाणी पुरवठा करणे प्रत्येक गावांचे घनकचरा व सांडपाण्याचे प्रकल्प उभारणे, गोवर्धन प्रकल्प उभारणे, प्रत्येक गावांमध्ये शोषखड्डे निर्माण करणे, तालुकास्तरावर प्लास्टिक संकलन केंद्र उभा करणे आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत. यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून राज्यातील सर्व गावांना पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. गाव कचरामुक्त करण्यासाठी व गावातील प्रत्येकाला शुद्ध पाणी पुरवण्यासाठी सरपंच व पाणीपुरवठा व स्वच्छता समिती सदस्यांनी पाणी व स्वच्छता उपक्रमांमध्ये सक्रिय झाले पाहिजे, असे आवाहन पाणीपुरवठा स्वच्छता विभागाचे सचिव संजय चहांदे यांनी केले.
भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यामध्ये स्वच्छता ही सेवा गावे हागणदारीमुक्त अधिक घोषित करणे, स्थायित्व सुजलाम अभियान स्वच्छता सर्वेक्षण मैलागाळ व्यवस्थापन घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय उभारणी व दुरुस्ती करणे आदी उपक्रम या वर्षामध्ये राज्यातील सर्व गावांमध्ये पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत राबविण्यात येणार आहेत. गावामध्ये गटर वॉटर मीटर यासारख्या संकल्पना राबवून गावे सरपंचांनी स्वयंपूर्ण केली पाहिजेत. शुद्ध पाणीपुरवठा व हागणदारी मुक्त गावांसाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मोठय़ा प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून देणार आहे. सरपंचांनी 15 व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून गावामध्ये शोष खड्डे निर्मितीचे कामे सुरू करावीत, कचरा व्यवस्थापन व पाणीपुरवठा योजना अंमलबजावणीमध्ये सरपंचांनी सहभागी व्हावे, असे मत पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी मांडले.
स्वच्छता हेच अमृत हा उपक्रम व शोषखड्डे निर्मिती कचरा व्यवस्थापन प्लास्टिक निर्मूलन उपक्रम आगामी काळामध्ये राज्यात राबवण्यात येईल, अशी ग्वाही उपसचिव अभय महाजन यांनी दिली. सरपंच स्वच्छता संवाद बैठकीस राज्यातील सर्व सरपंच कृषिमंत्री दादासाहेब भुसे, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे राज्यमंत्री संजय बनसोडे, सचिव संजय चहांदे, उपसचिव अभय महाजन राज्यातील सर्व जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी या संवाद उपक्रमात उपस्थित होते.