ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारत सध्या कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. देशातील आरोग्य यंत्रणा समोर आलेल्या अडचणींवर मात करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करत असली तरी अनेक ठिकाणी ऑक्सिजनअभावी, औषधांअभावी रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या आव्हानासमोर सरकारी यंत्रणा अपुरी पडत असल्याची टीका सर्वत्र होताना दिसत आहे. त्यातच आता भाजप नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक मत व्यक्त केले आहे.
पंतप्रधान कार्यालय हे निरुपयोगी आहे. देशातील कोरोना परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी आता नितीन गडकरी यांच्यावर सोपविली पाहिजे, असे मत भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केले.
भारताने मुस्लीम आक्रमक आणि ब्रिटीश साम्राज्यशाहीचे संकट ज्याप्रमाणे परतावून लावले तसेच कोरोनाच्या संकटानंतरही भारत तग धरून राहील. नियमांचे पालन न केल्यास भारताला कदाचित कोरोनाच्या आणखी एका लाटेचा सामना करावा लागू शकतो. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लढ्याची सूत्रे नितीन गडकरी यांच्याकडे सोपवायला हवीत. पंतप्रधान कार्यालयावर विसंबून राहणे, हे निरुपयोगी ठरेल, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोकळीक दिली आहे. मात्र, अतिनम्र स्वभावामुळे त्यांना ते सर्व निर्णय प्रभावीपणे राबवू शकत नाहीत. नितीन गडकरी त्यांच्या मदतीला आल्यास डॉ. हर्ष वर्धन अधिक खुलून काम करतील, असेही सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.