ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना विषाणूविरूद्धच्या लढाईत लसीकरण मोहीम वेगाने प्रगती करत असून बुधवारी लसीकरणाचा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. याबाबत माहिती देताना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, देशात आतापर्यंत 60 कोटींपेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. मंगळवारपर्यंत देशात 59.55 कोटी नागरिकांना लस मिळाली होती आणि बुधवारी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत लसीकरणाचा आकडा 60 कोटींच्या पुढे गेला आहे. अजूनही लसीकरण चालू आहे त्यामुळे हा आकडा अजून वाढणार आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी देशाने लसीकरणामध्ये 60 कोटींचा आकडा पार केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आहेत. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या ’सर्वांसाठी लसीकरण, मोफत लसीकरण’ या मोहिमेमुळे भारताने 60 कोटी कोरोना लसीकरणाचा टप्पा पार केला आहे. सर्वांचे अभिनंदन!
लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्प्यात मंगळवारी रात्री उशिरापर्यंत लसीकरण सुरू झाल्यापासून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 18-44 वयोगटातील एकूण 22 कोटी 33 लाख 59 हजार 860 व्यक्तींना त्यांचा पहिला डोस देण्यात आला. तर 11 लाख 37 हजार 082 जणांना दुसरा डोस दिला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, संध्याकाळी 7 च्या अहवालानुसार 38,29,038 लोकांना पहिला डोस आणि 16,38,513 लाभार्थ्यांना लसीकरण मोहिमेच्या 221 व्या दिवशी दुसरा डोस देण्यात आला.
दरम्यान, देशात 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीमेला सुरूवात झाली. यामध्ये आरोग्य कर्मचाऱयांना (एचसीडब्ल्यू) प्रथम लसीकरण करण्यात आले आणि 2 फेब्रुवारीपासून प्रंटलाइन कर्मचारी (एफएलडब्ल्यू) लसीकरण करण्यात आले. तर कोविड -19 लसीकरणाचा पुढील टप्पा 1 मार्चपासून 60 वर्षांपेक्षा जास्त व 45 वर्षांवरील लोकांसाठी सुरू झाला.