विभागीय आयुक्तांच्या सूचना
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
कोरोनाची तिसरी लाट आलीच तर तिच्या प्रतिबंधासाठी सूक्ष्म नियोजन करावे. कोणताही अपघात होणार नाही, याची दक्षताही घ्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त विलास पाटील यांनी दिले.
कोकण विभागीय आयुक्तपदाचा कार्यभार घेतल्यानंतर आयुक्त पाटील प्रथमच जिल्हा दौऱयावर आले होते. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी त्यांचे स्वागत केले. या बैठकीला पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, सहायक जिल्हाधिकारी संजिता महोपात्रा, अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुंभागी साठे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी संगणकीय सादरीकरण करून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत माहिती दिली. रुग्णांची संख्या, रुग्ण बरे होण्याचा दर, मृत्यूदर, खाटांची उपलब्धता आणि नियोजन, ऑक्सिजनची उपलब्धता आणि प्रगतीपथावरील प्रकल्प याचा त्यात समावेश होता. त्याचबरोबर तौक्ते चक्रीवादळ अनुदान वितरणाबाबतही त्यांनी माहिती दिली. सद्यस्थितीत जिल्हय़ात दक्ष असणाऱया आपत्ती व्यवस्थापन पथकाबाबतही अवगत केले.
विभागीय आयुक्त पाटील समाधान व्यक्त करून म्हणाले, टीमवर्क म्हणून तुम्ही सगळे आजवर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी काम करत आहात. येथून पुढे याच पध्दतीने चांगले काम करा. विशेषत: तपासणी वाढवणे, खाटांचे नियोजन, प्रगतीपथावर असणारे प्राणवायूचे प्रकल्प यावर भर द्यावा. कोणताही अपघात होणार नाही याची दक्षता घेऊन सूक्ष्म नियोजन करावे. तौक्ते चक्रीवादळाबाबत अनुदान प्राधान्याने वितरित करावे. पावसाळय़ात दरड कोसळणे, झाड पडणे, रस्ता खचणे अशा आपत्तींसाठी यंत्रसामुग्री, मनुष्यबळ अधिक सतर्क ठेवावे. त्याचबरोबर तिलारी प्रकल्पातून पाणी विसर्गाबाबतही पाटबंधारे विभागाने समन्वयाने काम करावे. अधिकाऱयांनी आजवर आलेल्या अनुभवाचा वापर आपत्ती निवारणासाठी संघटितपणे करावा.
बैठकीला प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, वैशाली राजमाने, वंदना खरमाळे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधवले, डॉ. संदेश कांबळे, जिल्हा प्रशासन अधिकारी वैभव साबळे आदी उपस्थित होते.