निवडणूक आयोगाकडून कडक नियमावली
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना संसर्गामुळे पाच राज्यांच्या निवडणूक रणधुमाळीत ‘ऑनलाईन’वरच अधिक भर देण्याचा आग्रह निवडणूक आयोगाने धरला आहे. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानेही नामांकनादरम्यान गर्दी पूर्णपणे मर्यादित केली आहे. आता उमेदवारासह दोघांना अर्ज भरण्यासाठी रिटर्निंग ऑफिसरकडे जाता येणार आहे. यापूर्वी उमेदवारासोबत पाच जणांना येण्याची मुभा होती, मात्र अनेकदा उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी रिटर्निंग ऑफिसरपर्यंत प्रचंड गर्दी करून पोहोचत असल्याचे दिसून आले. तूर्तास आयोगाने यावर कडकपणा दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नव्हे तर 15 जानेवारीपर्यंत कोणत्याही उमेदवार किंवा राजकीय पक्षांच्या रॅली, सभा, मिरवणुका आदींवर आयोगाने बंदी घातली आहे. त्याचवेळी, यानंतर अटी लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाने नामांकनाची संपूर्ण यंत्रणा ऑनलाईन केली आहे. त्यानुसार उमेदवार ऑनलाईन नामांकन अर्ज भरू शकतील. प्रतिज्ञापत्र आणि सुरक्षा ठेवही ऑनलाईन सादर करता येणार आहे. यासोबतच, राजकीय पक्ष आणि उमेदवारांना निवडणुकीदरम्यान कोरोनासंबंधी मार्गदर्शक तत्त्वांचे पूर्णपणे पालन करण्याची हमीही लेखी स्वरुपात द्यावी लागणार आहे. तसेच राजकीय पक्षांना कोणत्याही कार्यालयात जाऊन रॅली वगैरेसाठी परवानगी मागावी लागणार नाही. ते ऍपद्वारे मंजुरी मिळाली की नाही हे तपासू शकणार आहेत.
सर्व मतदारांचे थर्मल स्कॅनिंग करणार
कोरोनापासून संरक्षणासाठी निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांवर थर्मल स्कॅनिंगचीही कडक व्यवस्था केली आहे. याअंतर्गत मतदानासाठी केंद्रावर आलेल्या कोणत्याही मतदाराच्या शरीराचे तापमान निर्धारित मानकांपेक्षा जास्त आढळल्यास त्याची मतदान करण्यासाठी स्वतंत्र सोय केली जाणार आहे.
ईव्हीएम विश्वसनीय असल्याचा अभिमान
निवडणुकीसाठी वापरण्यात येणारी ईव्हीएम ही एक विश्वासार्ह मशीन आहे. याचा देशाला अभिमान वाटला पाहिजे. त्यामुळे आता शंका घेण्यात अर्थ नाही. यातून आज झपाटय़ाने निवडणूक निकाल मिळत आहेत, असे पाच राज्यांच्या निवडणुकांच्या घोषणेदरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त चंद्रा यांनी ईव्हीएमशी संबंधित एका प्रश्नावर बोलताना सांगितले.
हेराफेरी रोखण्यासाठी सी-व्हिजिल ऍप
निवडणुकीतील अनियमितता टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने सी-व्हिजिल ऍपची रचना केली आहे. या ऍपच्या मदतीने मतदार निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार नोंदवू शकतात. निवडणूक आयोग हे ऍप गेल्या तीन वर्षांपासून सर्व प्रकारच्या निवडणुकांमध्ये वापरत आहे. निवडणुकीदरम्यान लोकांनी हय़ा ऍपचा वापर करावा, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. निवडणुकीदरम्यान लोकांनी या ऍपच्या माध्यमातून थेट तक्रार करावी, आम्ही कारवाई करू, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
15 जानेवारीपर्यंत रॅली, रोड शो रद्द, विजयी मिरवणुकीवर बंदी
निवडणुकीदरम्यान आमची सुरक्षा सर्वात महत्त्वाची असते. लसीकरण मोहीम अधिक तीव्र करण्यात येत आहे. सर्व निवडणूक कार्यकर्त्यांना कोरोना लसीचे दोन्ही डोस असणे आवश्यक आहे. निवडणुकीचा प्रचार व्हर्च्युअल रॅलीद्वारेच केला जाणार आहे. केवळ 5 जण घरोघरी जाऊन प्रचार करू शकतात. प्रत्येक रॅलीपूर्वी उमेदवाराकडून प्रतिज्ञापत्र घेतले जाईल. 15 जानेवारीपर्यंत रॅली, रोड शो आणि पदयात्रा होणार नाही. रस्त्यावरील सभा, बाईक रॅली यांनाही बंदी घालण्यात आली आहे. विजयानंतर उमेदवारांना विजयी मिरवणूक काढता येणार नाही, असे सुशील चंद्रा म्हणाले.