जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या…
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ या नव्या उत्परिवर्तित प्रकाराचे जगभर भय पसरले आहे. कोरोनास्थिती बद्दल जगातील काही देशांचा मागोवा घेतल्यास कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ”ओमिक्रोन”चा प्रादुर्भाव दिवसें – दिवस वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोना लस घेतलेल्यांमध्ये तयार झालेल्या प्रतिकारशक्तीवर सुद्धा हा ओमिक्रोन व्हेरिएंट मात करत असल्याचं समोर आल्यानं जगभरात पुन्हा चिंतेचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभुमीवर कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने भारतासाठी गंभीर इशारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही शनिवारी बैठक घेत देशातील कोरोना स्थितीविषयक उपाययोजनांचा आढावा घेत कोरोनाच्या व्हेरिएंटबाबतची सद्य स्थितीची माहिती करुन घेतली.
या बैठकीत देशातील आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवर निर्णयावर फेरविचार करण्याचे निर्देशही त्यांनी हवाई वाहतूक मंत्रालयाला दिलेत. आता मात्र जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी देखील ‘ओमिक्रॉन’ भारतासाठी गंभीर इशारा असल्याचे म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्वामीनाथन यांनी नागरिकांना खबरदारीचे आणि मास्क वापरण्यासाठी आवाहन केले आहे.यावेळी स्वामिनाथन यांनी मास्क “तुमच्या खिशातील लस” असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तसेच ओमिक्रॉन या नव्या कोरोना व्हेरियंटशी लढण्यासाठी विज्ञान-आधारित धोरण राबवण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. याबरोबर वयोवृद्धांचे संपूर्ण लसीकरण, मोठ्या प्रमाणात एकत्र येणे टाळणे, कोणतेही सुक्ष्म लक्षणे आढळल्यास त्वरीत तज्ज्ञांना भेटने गरजेचे आहे. तसेच ‘ओमिक्रॉन’ बाबत शास्त्रज्ञांनी काही टिप्स दिल्या आहेत ज्यामुळे चिंता कमी होऊ शकते.” असेही त्या यावेळी म्हणाल्या.
यावेळी स्वामिनाथन म्हणाल्या की, “हा प्रकार डेल्टापेक्षा जास्त संसर्गजन्य असू शकतो. अद्याप अधिकृतपणे काहीही सांगता येत नसले तरी आम्हाला काही दिवसांत या ओमिक्रॉनबद्दल अधिक माहिती मिळेल.”या चिंतेमुळे जगभरातील देशांमध्ये प्रवासी निर्बंधांची एक नवीन लाट असेल आणि आर्थिक बाजारपेठांमध्ये देखील याचे परिणाम होत आहेत असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. त्यामुळे उशिरा निर्णय घेत झालेल्या जीवित व अर्थिक नुकसाणीवर मलमपट्टी करण्यापेक्षा कोरोना फैलाव होण्यापुर्वीच उपाय योजना करणे गरजेचे आहे. यासाठी तज्ज्ञांच्या मदतीने कोरोना नियमांची आखणी करत केंद्र व राज्य सरकारने नियमावली जारी करणे आवश्यक आहे. तरच कोरोना संसर्गाचा फैलाव रोखण्यात यंत्रणा यशस्वी ठरेल.