देशात दिवसभरातील पॉझिटिव्ह साडेबावीस हजारांवर : मृतांचा आकडा 18 हजार 655 वर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत असून शनिवारपर्यंत गेल्या चोवीस तासात तब्बल 22,771 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. रुग्णसंख्या वाढत असतानाच बरे होणाऱया रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असून हे प्रमाण आता 61 टक्क्यांच्या वर पोहोचले आहे. शनिवारी दिवसभरात 442 रुग्णांचा मृत्यू झाला असून देशातील एकूण मृतांचा आकडा 18 हजार 655 वर पोहोचला आहे.
देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 6,48,315 इतकी झाली आहे. यापैकी 2 लाख 35 हजार 433 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 3 लाख 94 हजार 227 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. तरीही रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 60.72 टक्के झाल्यामुळे थोडाफार दिलासा व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि राजस्थानात कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. महाराष्ट्रात 6,364 नवे रुग्ण सापडल्याने आता एकूण बाधितांचा आकडा 1 लाख 93 हजारवर पोहोचला आहे. तर, 198 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 8,376 झाला आहे. तामिळनाडूत 4,329 तर दिल्लीत 2,520 नवे रुग्ण सापडले आहेत. सध्या केवळ महाराष्ट्र आणि तामिळनाडू या दोन राज्यांमध्ये कोरोना बाधितांच्या आकडय़ाने एक लाखांचा आकडा पार केला आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासांमध्ये 2 लाख 42 हजार 576 नमुना चाचण्या झाल्या असून एकूण 95 लाख 40 हजार 749 चाचण्या करण्यात आल्या.
उपचारासाठी नवे दिशानिर्देश
कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आरोग्य मंत्रालयाने नवीन दिशानिर्देश जारी केले आहेत. या अंतर्गत आता कोरोना उपचारावर प्रभावी ठरलेल्या रेमडेसिव्हिरचा डोस कमी करण्यात आला आहे. या औषधाचा वापर केवळ आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यातच केला जाणार आहे. प्रकृती गंभीर असलेल्या व्यक्तीस हे औषध न देण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. आता हे औषध केवळ पाच दिवस रुग्णांना दिले जाणार आहे. रेमडेसिव्हिर हे एक अँटीव्हायरल औषध असून ते इंजेक्शन स्वरूपात दिले जाते. पहिल्या दिवशी रुग्णाला रेमडेसिव्हिरचा 200 मिलिग्रॅम डोस इंजेक्शन स्वरूपात दिला जाईल. यानंतर पुढील 4 दिवस 100-100 मिलिग्रॅमचा डोस दिला जाणार आहे. आरोग्य मंत्रालयाने 13 जूनला रेमडेसिव्हिरचा वापर करण्याची परवानगी दिली होती.
सहा शहरांमधील विमानांना कोलकात्यात लॅण्डिंगला मनाई
पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सहा शहरांमधून येणाऱया विमानांना कोलकाता विमानतळावर लॅण्डिंग करण्यास ममता बॅनर्जी सरकारने मनाई केली आहे. या शहरांमधील महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर या तीन विमानतळांचा समावेश असून दिल्ली, चेन्नई आणि अहमदाबाद अशा अन्य तीन शहरांमधून येणाऱया विमानांनाही उतरण्यास अनुमती देण्यात येणार नाही. राज्य सरकारच्यावतीने यासंबंधीची माहिती विमानतळ प्राधिकरणाला देण्यात आली आहे. 6 ते 19 जुलै किंवा पुढील आदेशापर्यंत ही अंमलबजावणी केली जाणार आहे. विमानांच्या लॅण्डिंगला मनाई करण्यात आली असली तरी सदर सहा शहरांमध्ये जाणाऱया विमानांना (उड्डाणे) कोणताही अटकाव करण्यात आलेला नाही.