प्रतिनिधी / पणजी
गोव्यापासून अवघ्या 100 किलोमीटरवर असलेल्या बेळगावमध्ये कोरोना व्हायरसचा प्रभाव वाढू लागल्याने गोव्यातील लोकामंध्ये प्रचंड मोठी धास्ती निर्माण झाली आहे. गोव्यात येण्यासाठी असलेल्या पारंपरिक रस्त्यांवरून बेळगावचे लोक गोव्यात येत असल्याने तो एक चिंतेचा विषय ठरला आहे. त्याचबरोबर बेळगावमधील भाजीपाला घेऊन मोठय़ा प्रमाणात वाहने गोव्यात येत आहेत, त्यामुळेही गोव्यात धास्ती निर्माण झाली आहे.
सत्तरीतील काही भागातून तासाभरात बेळगाव गाठता येते. नजीकचा परिसर असलेल्या बेळगावमध्ये सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. गोवा अजूनही कोरोनाच्या बाबतीत तसा सुरक्षित आहे. सरकारने बेळगावमधून येणारा भाजीपाला रोखण्यासंदर्भातही विचार चालविला आहे. लॉकडाऊन नंतर गोव्यात भाजीपाल्याची आवक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. गोव्यात येणारा भाजीपाला हा बेळगावमधूनच येतो त्यामुळे सरकारने आता बेळगावमधून येणाऱया साहित्यावर निर्बंध घालावे, अशी मागणी होऊ लागली आहे.