प्रतिनिधी / इस्लामपूर
वाळवा तालुक्यासह सांगली जिल्हयात कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. जलसंपदा मंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी कोरोना काळात लोकांच्या जीवाशी खेळून खूनशीपणाचे राजकारण करु नये, सध्या बेड, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर उपलब्ध होत नाहीत. जिल्हयाचे एक निष्क्रिय पालकमंत्री म्हणून त्यांची ओळख होत आहे. प्रकाश हॉस्पिटलला ६५० बेडची सोय असताना १७५ बेडची परवानगी दिली आहे.
यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. मात्र पालकमंत्र्यांच्या दबावाने ६५० बेडची परवानगी नाकारली, असल्याचा आरोप प्रकाश हॉस्पिटलचे संस्थापक, भाजपाचे जिल्हापाध्यक्ष व नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी पत्रकार बैठकीत केला.
नगराध्यक्ष पाटील पुढे म्हणाले, पालकमंत्र्यांनी पाहूण्यासारखे शनिवार, रविवारी जिल्हयात न येता, तळ ठोका व रुग्णांची सोय करा. त्यांनी ज्या पध्दतीने प्रतिबंधक उपाययोजना करायला हव्या होत्या. त्या केल्या नाहीत, यासगळया बाबींचा त्रास रुग्णांना होत आहे. ऑक्सिजन अभावी लोक मृत्यूमुखी पडत आहेत. वाळवा तालुक्यात १४ हॉस्पिटल आहेत. त्यामध्ये ५६६ बेड अधिकृत करण्यात आले आहेत. पण ही सर्व हॉस्पिटल मध्यवर्ती ठिकाणी आहेत. त्यामुळे अनेक लोकांचा संपर्क येत आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. या गोष्टी टाळणे गरजेचे आहेत. मात्र दुर्दैवाने पालकमंत्र्यांचे त्याकडे लक्ष नाही. नॉन-कोविड रुग्णांचे हाल होत आहेत. त्यांनी खूनशीपणाचे राजकारण करु नये.
पाटील पुढे म्हणाले, प्रकाश हॉस्पिटलमध्ये ६५० बेडची सोय आहे. ६ के.एल क्षमतेचे ऑक्सिजन टँक आहे. तसेच आरटीपीसीआर, एचआरसीटीची सोय आहे. यामुळे रुग्णांची सगळी सोय एका छताखाली होत आहे. हॉस्पिटल प्रशासनाकडून या सोयींचा उपयोग कोविड रुग्णांना होईल. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. मात्र या पत्राची दखल घेतली नाही. महात्मा फुले जनआरोग्य योजना प्रकाश हॉस्पिटलमध्ये कोविडसाठी स्थगित केली जाते, हे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण आहे. जिल्हयातील अनेक हॉस्पिटल्सना व्हेंटेलेटर दिले. मात्र त्यातील एक ही व्हेंटेलेटर ‘प्रकाश’ला दिला गेला नाही. ६५० बेडची सोय असूनही १०५ पेक्षा जास्त रुग्ण होत असतील तर त्यांना डिचार्ज करा, अशा सूचना दिल्या जातात.
राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवारांनी साखर कारखान्यांना १०० बेडची व्यवस्था करावी, असे आदेश दिले होते. त्यात तुम्ही किती बेडची सोय केली, अशा प्रश्न उपस्थित करत जो करतो आहे त्याला करु द्यायचे नाही, असे कुटील राजकारण करू नका. राष्ट्रवादीचे आ.निलेश लंके यांनी १००० बेडची व्यवस्था केली आहे.
पाटील पुढे म्हणाले, रेमडिसिव्हिरच्या औषधामध्ये मागणी पेक्षा पुरवठा कमी केला जातो. या सर्व बाबींचा विचार करता रुग्णांच्या जीवा पेक्षा कोणतही गोष्ट महत्वाची नाही. जिल्हयात राजारामबापू पाटील, वंसतदादा पाटील, पंतगराव कदम, आर.आर.पाटील यासारखे मोठे नेते होवून गेले, पण त्यांनी विधायक कामात राजकारण केले नाही
होते.
प्रकाश हॉस्पिटलला भेट द्या
प्रकाश हॉस्पिटलमध्ये ६५० बेडची सोय असताना १७५ बेडची परवानगी दिली आहे. रुग्णांच्या जीवाश्म न खेळता सहकार्याची भूमिका ठेवा, पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रकाश हॉस्पिटलला एकदा भेट द्यावी, व त्यांनी ठरवावे, की ६५० बेडची परवानगी द्यावी, का नको, असे नगराध्यक्ष पाटील यांनी पालकमंत्र्यांना आवाहन केले.
जयंत पाटील फोन घेत नाहीत
यावेळी निशिकांत पाटील म्हणाले, महामारीचा एकीने सामना करण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांना मी स्वत: तीन वेळा फोन केले. पण त्यांनी फोन घेतला नाही, ही राजकारण करायची वेळ नाही, लोकांचे जीव वाचावेत यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, रुग्णांना न्याय मिळाला नाही तर राज्यपाल, व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, सर्व पक्षांच्या अध्यक्षांना न्याय मागण्यासाठी निवेदन दिले जाईल, त्यातून उच्च न्यायालयात दाद मागितली जाईल, असा इशारा नगराध्यक्ष पाटील यांनी दिला.