सावरी, मैनापी, उदेंगी धबधबे फेसाळत वाहू लागले, पण पर्यटकांना प्रवेशबंदीमुळे सारी स्थळे निर्मनुष्य, स्थानिकांच्या उत्पन्नावर परिणाम
प्रसाद तिळवे /सांगे
निसर्गसौंदर्याचा सुंदर आविष्कार घडविणाऱया नेत्रावळीत सध्या बहर आला आहे. नेत्रावळी अभयारण्यातील प्रसिद्ध ‘सावरी’ आणि ‘मैनापी’ धबधबे धो धो वाहत कोसळू लागले आहेत. मात्र कोरोना महामारीमुळे प्रवेशबंदी असल्याने हे मनोहारी दृष्य पाहण्यासाठी देशी-पर्यटकांची गर्दी धबधब्यांच्या स्थळी पाहायला मिळत नाही. डोळय़ांचे पारणे फेडणारे हे धबधबे सध्या निर्मनुष्य झाले आहेत. यामुळे वन खात्याला मिळणारा महसूल बुडाला आहे तसेच नेत्रावळी येथील लोकांचा व्यवसाय थंडावला आहे. त्यामुळे आर्थिक उत्पन्न मिळत नाही. एकूणच कोरोना महामारीमुळे नेत्रावळीतील ‘इको टुरिझम’ बंदच पडले आहे.
शनिवारी आणि रविवारी तसेच अन्य सुट्टय़ांच्या दिवशी नेत्रावळीत पर्यटकांची झुंबड उडायची. तरुणांईची पेझ निराळीच असायची. पावसात ओलेचिंब होऊन आनंद लुटणे, मौजमजा करणे याला प्राधान्य असायचे. नेत्रावळीवर निसर्गाने भरभरून प्रेम केले आहे. येथे प्रसिद्ध सावरी धबधब्यासह तुडवचा मैनापी धबधबा, तुडव गावातील उदेंगी धबधबा, पालीचा धबधबा यासह वेर्ले ते साळजिणी रस्त्याच्या बाजूने पावसाळय़ात कोसळणारे असंख्य लहान धबधबे पर्यटकांचे मन प्रसन्न करून सोडत असतात. सध्या हे धबधबे एप्रिलपासून संचारबंदी असल्याने पर्यटकांसाठी बंद आहेत.
नेत्रावळीत ‘इको टुरिझम’ आणि ‘साहसी पर्यटना’ला खूप वाव आहे. मात्र वनखाते व नेत्रावळी अभयारण्य विभाग त्यादृष्टीने विकास करण्यात कमी पडल्याचे जाणवते. सावरी आणि मैनापी धबधब्यांकडे जाण्यासाठी वनखाते पर्यटकाकडून फी आकारते. पण कपडे बदलण्यासाठी साधी चेंजिंग रूमची सोय नाही. सावरी धबधब्याकडे जाण्यासाठी वेर्ले रस्त्याच्या बाजूने वाहने पार्क करून माट्टोनी येथून जो मातीचा रस्ता आला आहे त्याद्वारे पुढे जाता येते. या ठिकाणी वृद्ध, महिला, लहान मुलांना सहज जाता येते.
वन खात्याचा महसूल बुडाला
पावसाळा सुरू झाला की, मोठय़ा प्रमाणात निसर्गप्रेमींची पावले सावरी धबधब्याकडे वळायची. उन्हाळय़ात विदेशी पर्यटक मोठय़ा प्रमाणात सावरी व मैनापीला भेट देत. सावरी धबधबा खूप प्रसिद्ध आहे. सुमारे 60 फूट उंचावरून कोसळणारा हा धबधबा सध्या पाहण्यास खूप मजा येते. कोसळणारे पांढरे शुभ्र व थंडगार पाणी अंगावर शहारे आणते. सावरी व मैनापी धबधब्यांकडे जाणाऱया पर्यटकांकडून वनखाते प्रवेश, वाहन, कॅमेरा फी आकारत असे. सध्या पर्यटकांना प्रवेश बंद असल्याने वन खात्याचा महसूल बुडाला आहे.
सकाळी 8 ते संध्या. 4.30 पर्यंत येथे प्रवेश दिला जायचा. नेत्रावळी, माट्टोनी येथील वन खात्याचे प्रवेशद्वार ते सावरी धबधबा हे अंतर 3.5 किलोमीटर इतके आहे. नेत्रावळी वन्यजीव विभागाने पर्यटकांना सोयीचे व्हावे म्हणून चिऱयांच्या 250 पायऱया सावरी धबधब्याच्या ठिकाणी बांधलेल्या आहेत. शिवाय जीवरक्षक तैनात केले आहेत. अजूनही अनेक सुविधांची येथे वानवा आहे. सावरी धबधब्याच्या वरच्या बाजूस श्री नासादेव मंदिर असून तो धबधब्यातून येणाऱया पाण्याचे रक्षण करतो असा गावकऱयांचा विश्वास आहे.
फेसाळणाऱया धबधब्यांचे आकर्षण
सावरीसह मैनापी आणि उदेंगी धबधबा बारमाही कोसळतो. मैनापी धबधबा हा तुडव येथे जंगलात आहे. नेत्रावळीहून सुमारे 14 किलोमीटर पदभ्रमण करत धबधब्याकडे पोहोचता येते. पावसाळय़ात हे जिकिरीचे असून साहसी पर्यटक व तरुणाईचा कल या धबधब्याकडे जास्त असायचा. सध्या नेत्रावळीतील सर्व धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. फेसाळणारे हे धबधबे जणू निसर्गप्रेमांना व पर्यटकांना साद घालत आहेत. तुडव येथील गावातच असलेला उदेंगी धबधबा वयोवृद्ध आणि बच्चे कंपनीसाठी योग्य आहे. पालीचा धबधबा व मैनापी धबधबा गिर्यारोहणाची आवड असलेल्यांसाठी उपयुक्त आहेत. गोवाभरातील गिर्यारोहक पावसाळय़ात पाली, मैनापीला अधिक पसंती द्यायचे.
धबधब्यांसह नेत्रावळी येथील प्रसिद्ध बुडबुड तळी व श्री गोपीनाथाचे देऊळ, पुरातन दत्तगुंफा व तेथील श्री दत्तमंदिर, हिल स्टेशन म्हणून वेर्ले आणि साळजिणी गाव, मसाल्याच्या बागा, पोफळीच्या बागायती वर्षा पर्यटनात भर घालत असतात. तसा उर्वरित गोव्यापेक्षा येथे पाऊसही जास्त पडतो. सध्या नेत्रावळीत पर्यटनस्थळी पर्यटकांना बंदी असल्याने येथील दुकानदार, इको-टुरिझमवाले, गाईड यांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. आता लोकांना केव्हा एकदाची येथील पर्यटनस्थळे खुली होतील याची प्रतीक्षा आहे. मात्र कोरोनाच्या तिसऱया लाटेचेही भय आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासन येणाऱया काळात कोणता निर्णय घेते हे पाहावे लागेल.