वार्ताहर / माशेल
राज्य कर्फ्यूचे नियम शिथील झाल्यानंतर माशेल परिसरातील बहुतेक दुकाने उघडी प्रकार सुरू होत असल्यामुळे माशेल बाजारात गर्दीचे स्वरूप प्राप्त होत आहे.
7 जूननंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत कडधान्य, भाजी व दुध दुकानाबरोबर डार्डवेअर, छत्री, रेनकोट दुकानांना सुट दिल्यानंतर पावसाळय़ाची खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. त्यासह छोटी-मोठी दुकाने सुरू झाल्याने सर्वत्र गर्दी वाढू लागली आहे. सायंकाळच्या सुमारास माशेल परिसरात भाजी, मासळी विक्रेते मार्केटमध्ये न बसता बाजाराच्या आजूबाजूला बसलेले आढळतात. मासळी, भाजी विकत घ्यायला सकाळपासूनच गर्दी उडालेली असते. यावर कोणाचेच नियंत्रण राहिलेले नाही. बाजारहटीसाठी येणारे ग्राहकही बिनधास्तपणे सुरक्षित अंतर न ठेवता फिरतात यावेळी काही फेसमास्कही लावत नसल्याचे निदर्शनास येते. किराणा मालाच्या व भाजीच्या दुकानात गर्दी ही कायमची दिसून येते. खरेदीसाठी आलेले ग्राहक गर्दी करताना पाहून दुकानदाराही त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करीत नाहीत. बेतकी आरोग्य केंद्रावर कोरोनाबाधितांचा घटली असली तरी सर्वानी काळजी घेणे अंत्यत गरजेचे असल्याचे मत आरोग्यधिकारी डॉ. ब्रेडा पिंटो मांडत असतात.
कोरोनाचा आलेख कमी होऊ लागल्यानंतर सर्व दुकाने उघडी असा समज करून बिनधास्त वावरत आहे. तीच गत हॉटेलवाल्याची झालेली आहे, पार्सल सर्व्हीसला प्रतिसाद कमी मिळत असल्यामुळे त्यांनीही सर्रासपणे हॉटेल गिऱहाईकांना बसविण्याचे प्रकार अवलंबवलेले आहे. पोलिसांनी हटकविल्यानंतर तात्पुरते नियम पाळतात त्य़ानंतर परत तीच रि ओढताना दिसतात. कोरोनाचा विळखा अजून संपलेला नसून स्थानिक पंचायतीतर्फे पुढाकार घेऊन यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कोरोना मार्गदर्शक तत्वाचे पालन सर्व नागरिकांनी केल्यानंतर कोरोनापासून बचाव होऊ शकतो त्यामुळे सर्वानी शिस्तीने वागावे असे काही सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे.