प्रतिनिधी/सातारा
800 चा आकडा पार केलेल्या कोरोना बाधितांच्या संख्येने तशी जिल्हय़ातील नागरिकांची झोपच उडवली आहे. मात्र दुसरीकडे बाधितांच्या वेगापेक्षा जास्त वेगाने होणारी कोरोनामुक्ती नागरिकांना दिलासा देत आहे. शुक्रवारी देखील जिल्हय़ातील 13 जण कोरोनावर मात करत खडखडीत बरे होवून आपल्या घरी गेले असून त्यामुळे कोरोनामुक्तीचा 600 चा आकडा पार करत आरोग्य विभागाच्या परिश्रमाने कडवी झुंजच दिली आहे.
दरम्यान रात्री उशिरा आलेल्या अहवालामध्ये 13 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती देण्यात आली. यामुळे आता उपचार्थ 157 रुग्ण उरले असून मोठय़ा संख्येने येणाऱया बाधितांचा वेग मंदावला आहे. दरम्यान जिल्ह्यातील बहुतांशी व्यवहार सुरू होत असून जिल्हाधिकाऱ्यांनी 30 जूनपर्यंत रात्रीदेखील पेट्रोल पंप सुरू ठेवण्याचे तसेच कामगारांना पासेस देण्याचेेेे आदेश दिले आहेत.
एकूण 606 जण कोरोना मुक्त
गेल्या महिन्यात बाधितांचे आकडे मोठे येत असल्याने जिल्हय़ात भीतीचे वातावरण होते. अशा वातावरणातच लॉकडाऊन अनलॉक करताना अनेक गोष्टीत शिथिलता देण्यात येत आहे. तर दुसरीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने सगळीच गोंधळाची स्थिती निर्माण होत असतानाच मुक्त होणाऱयांचा आकडा वाढू लागला अन आता जिल्हय़ातील बहुतांशी व्यवहार सुरळीत होताना कोरोनामुक्तांच्या आकडय़ाने 600 चा आकडा पार केला आहे. शुक्रवारी 13 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याने आता जिल्ह्यातील एकूण 606 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
शुक्रवारी 13 जणांना दिला डिस्चार्ज
विविध रुग्णालयांमध्ये व कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल असणाऱ्या 13 जणांना आज 10 दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
सातारा तालुक्यातील पाच जण मुक्त
यामध्ये सातारा तालुक्यातील देगाव येथील 60 वर्षीय पुरुष, कुसवडे येथील 58 वर्षीय पुरुष, कुसबुद्रुक येथील 16 वर्षीय तरुण, कुसवडे (आसनगाव) येथील 47 व 19 वर्षीय महिला यांचा समावेश असून सातारा तालुका देखील कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे.
वाई तालुक्यातील पाचजण मुक्त
वाई तालुक्यातील 30 वर्षीय महिला, सोमेश्वरवाडी येथील 68 वर्षीय महिला,वेरुळी येथील 46 वर्षीय पुरुष, 11 वर्षीय मुलगा व 26 वर्षीय महिला असे पाच जण पूर्ण मुक्त झाले असून वाई तालुका देखील कोरोना मुक्तीकडे वाटचाल करू लागला आहे.
फलटण मधील एक, जावळीतील दोन मुक्त
फलटण तालुक्यातील बरड येथील 55 वर्षीय महिला, जावली तालुक्यातील भणंग येथील 40 वर्षीय महिला, जावली येथील 55 वर्षीय महिला यांना शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आला हे रुग्ण खडखडीत बरे होऊन घरी गेलेले आहेत.
13 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह
यामध्ये पाटण तालुक्यातील शेजवलवाडी येथील 58 वर्षीय पुरुष, दिघेवाडी येथील 24 वर्षीय महिला, धामणी येथील 21 वर्षीय तरुण कराड तालुक्यातील चिकली येथील 69 वर्षीय पुरुष, येळगाव येथील 47 वर्षीय पुरुष, हिंगनोळे येथील 54 वर्षीय पुरुष, तुळसण येथील 50,45, 54 व 79 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला,
जावली तालुकयातील शिंदेवाडी येथील 39 वर्षीय महिला, सातारा तालुक्यातील सावली येथील 22 वर्षीय पुरुष यांचााा समावेश आहे.
167 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 167 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, अशीही माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
213 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 30, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 41, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 18, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 19, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 6, शिरवळ येथील 19, रायगाव येथील 6, पानमळेवाडी येथील 14, मायणी येथील 15, महाबळेश्वर येथील 3, पाटण येथील 5, दहिवडी येथील 37 असे एकूण 213 जणांचे नमुने एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील बहुतांशी व्यवहार सुरू
सातारा जिल्ह्यात बहुतांशी व्यवहार सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व प्रकारची वाहने व अत्यावश्यक सेवेतील वाहने यांना इंधन पुरवठा सुलभ होण्याच्या दृष्टीने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी दि. 30 जून 2020 रोजीच्या 24.00 या कालावधीत रात्री 9.00 ते पहाटे 5.00 वाजेपर्यंत इंधन पंप चालु ठेवण्यास परवानगी दिली आहे. तथापि, रात्री रात्री 9.00 ते पहाटे 5.00 या कालावधीत चालू असणाऱ्या इंधन पंपावर अत्यावश्यक सेवेतील वाहने व सर्व प्रकारची मालवाहूकीची वाहने यानांच इंधन पुरवठा करणे बंधनकार राहील.
कामगारांना दैनंदिन पास देण्याचे आदेश
शासनाने राज्याची आर्थिक बाजू सक्षम होण्याच्या दृष्टीने उद्योग घटकांना परवानगी दिली आहे. सातारा जिल्ह्यातील विविध उद्योग घटकांमध्ये सातारा जिल्ह्याच्या स्थलसीमा हद्दीला लागून असणाऱ्या सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात कामगार कामास आहेत. विविध शासकीय, निमशासकीय विभागामाधील अधिकारी – कर्मचारी, खाजगी शाळा, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालयांचे सर्व शिक्षक व कर्मचारी वर्ग आणि सर्व बँक कर्मचारी यांना जिल्ह्याच्या हद्दीला लागून असणाऱ्या सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून वारंवार कामावर जाण्यासाठी ये-जा करावी लागते. त्याअनुषंगाने दैनंदिन पास वितरीत करण्याचे आदेेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.
खोटी माहिती देवून जिल्हय़ात प्रवेश
दरम्यान, जिल्हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असताना सातारा जिल्हय़ात बाहेरुन येण्यास जिल्हाधिकाऱयांनी बंदी केली आहे. त्यामुळे साताऱयास बाहेरुन जिल्हय़ातून यावयाचे असल्यास ऑनलाईन परवागनी देखील मिळत नाही. त्यामुळे सातारा जिल्हय़ातीलच पुणे व मुंबईतील भूमीपुत्र सांगली व कोल्हापूर जिल्हय़ाचा ई-पास काढून जिल्हय़ात येत आहेत. त्यांचा पास सांगली व कोल्हापूरचा असल्याने शिरवळ येथील नाक्यावर त्यांच्या हातावर होमक्वारंटाईनचे शिक्के मारले जात नाहीत. त्यामुळे खोटी माहिती देवून येणारे मुंबईकर जिल्हय़ाची फसवणूक करत आहेत. अशा नागरिकावर पुणे दाखल करण्याचा इशारा पोलीस विभागाने दिला आहे.
शुक्रवार पर्यंत जिल्ह्यात
एकूण बाधित 804
एकूण मुक्त 606
बळी 39
शुक्रवारी
एकूण बाधित 13
एकूण मुक्त 17
बळी 00