अचूक बातमी “तरुण भारत”ची, बुधवार, 6 ऑक्टोबर, 2021, सकाळी 8.45
● 50 हजारांच्या मदतीच्या घोषणेचा गोंधळ
● चौकशीसाठी प्रशासकीय कार्यालयात हेलपाटे
● प्रशासनाने स्पष्ट माहिती देण्याची गरज
● जिल्ह्यात 24 तासात 222 रूग्ण वाढले
● पॉझिटिव्हीटी रेटही वाढला
● 6 हजार 777 संशयितांच्या चाचण्या
सातारा / प्रतिनिधी :
मार्च 2020 पासून देशात कोरोनाचा कहर वाढला. कोरोनाच्या संकटाने आत्तापर्यंत 1 लाख 39 हजार 236 जणांना आपला जीव गमवावा लागला. कोरोनाची लाट आटोक्यात आली असतानाच कोरोनाने मृत झालेल्यांच्या कुटूंबियांना मदतीच्या बातम्यांचे वारे वेगाने पसरले. या मदतीच्या अपेक्षेपोटी थोड्या थोडक्या माहितीवर जिल्ह्यातील मृतांचे नातेवाईक प्रशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांमधे हेलपाटे मारू लागले आहेत. मदत नेमकी कधी मिळेल? कशी मिळेल? काय कागदपत्रे लागतील? याची कोणतीही सरकारी अधिसूचना नसल्याने लोकांची धावाधाव पहायला मिळत आहे. यावर प्रशासनाने स्पष्ट माहिती देण्याची गरज असून, या माहितीमुळे सध्या सुरू असलेली धावाधाव थांबेल. दरम्यान गेल्या 24 तासात जिल्ह्यात 222 नव्या रूग्णांची वाढ झाली आहे.
कोरोनाने माणूस हिरावला…मदतीच्या आधाराकडे लक्ष
सातारा जिल्ह्यात मंगळवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार 6 हजार 98 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. देशात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला 50 हजार रुपयांची मदत केली जाईल असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला यासंदर्भात वारंवार विचारणा करत अनेकवेळा फटकारलं होतं. अखेर त्याला उत्तर देताना केंद्र सरकारने ही माहिती दिली आहे. देशात आतापर्यंत सुमारे 4 कोटी नागरिकांनी प्राण गमावले आहेत. त्यांच्या कुटुंबांना मदतीची रक्कम राज्यांच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून ही रक्कम दिली जाईल, असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.
मदतीचे निकष अद्यापही ठरलेले नाहीत
कोरोनाने मृत झालेल्यांच्या कुटूंबियांना 50 हजारांची मदतीची माहिती वेगाने पसरली. त्यामुळे जिल्ह्यात अनेक कोरोना मृतांच्या नातेवाईकांची निकष समजून घेण्यासाठी धावाधाव सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे. नगरपालिका, पंचायत समिती, तहसील कार्यालयासह नगरेसवक, ग्रामपंचायत सदस्यांकडे काही कष्टकरी लोक माहिती घेण्यासाठी ये-जा करू लागले आहेत. त्यांची धावाधाव हेलावणारी आहे. त्यामुळे शासनाने यासंदर्भात नेमकी माहिती स्पष्ट करण्याची गरज आहे. माहिती स्पष्ट झाल्यास कोरोना मृतांच्या हेेलपाटे थांबतील.
मंगळवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 21,04,221
एकूण बाधित 2,49,532
घरी सोडण्यात आलेले 2,40,353
मृत्यू 6,098
उपचारार्थ रुग्ण 5,541
मंगळवारी जिल्हय़ात
बाधित 222
मुक्त 220
मृत्यू 00