कोरोना काळातील भारताची कामगिरी कौतुकास्पद असल्याचा निर्वाळा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी देशात करण्यात आलेल्या व्यवस्थेचे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी कौतुक केले. कोरोनामुळे जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई म्हणून 50 हजार रुपये देण्याच्या केंद्राच्या निर्णयावर न्यायालयाने समाधान व्यक्त केले. कोरोना काळात आपल्या प्रियजनांना गमावलेल्यांच्या कुटुंबियांच्यादृष्टीने केंद्राचे हे पाऊल निश्चितच दिलासादायी ठरेल असे न्यायालयाने म्हटले आहे.
लोकसंख्या, लसीवरील खर्च, आर्थिक स्थिती आणि आपल्या देशातील प्रतिकूल परिस्थिती पाहता असाधारण पावले उचलण्यात आली. भारताने केलेली कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. दुःखी व्यक्तीचे अश्रू पुसण्यासाठीही सरकारने विशेष पावले उचलल्याचा आम्हाला आनंद आहे, असे न्यायमूर्ती एम. आर. शाह सुनावणीदरम्यान म्हणाले.
कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची भरपाई केंद्र सरकारकडून निश्चित करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक मृत्यूमागे वारसांना 50,000 रुपयांची भरपाई दिली जाणार आहे. हा पैसा राज्यांच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून दिला जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने सरकारकडे नुकसान भरपाईबाबत मार्गदर्शक सूचना मागितल्यानंतर ‘एनडीएमए’ने ही माहिती दिली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने समाधान व्यक्त केले आहे. देशात आतापर्यंत 4.46 लाख लोकांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.
देशातील सक्रिय रुग्णसंख्या 6 महिन्यातील निचांकी
देशात कोरोनाचे 31 हजार 923 नवीन रुग्ण आढळल्यानंतर देशात संक्रमित लोकांची संख्या वाढून 3 कोटी 35 लाख 63 हजार 421 झाली आहे. याचदरम्यान उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 3 लाख 01 हजार 640 पर्यंत खाली आहे. ही सक्रिय रुग्णसंख्या 187 दिवसातील सर्वात कमी म्हणचे जवळपास सहा महिन्यातील निचांकी पातळीवर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, बुधवारी संक्रमणामुळे आणखी 282 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांची संख्या 4 लाख 46 हजार 050 झाली.
देशातील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन आकडेवारीत चढ-उतार अद्याप कायम आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशामध्ये बुधवारी दिवसभरात 31 हजार 923 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 282 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याचदरम्यान देशात दिवसभरात 31 हजार 990 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत 3 कोटी 35 लाख 63 हजार 421 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 3 कोटी 28 लाख 15 हजार 731 जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशात अद्यापही 3 लाख 1 हजार 640 इतके रुग्ण उपचाराधीन आहेत.