लवकरच परिस्थिती स्थिरावण्याची आशा, बरे होण्याच्या प्रमाणातही वाढ
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात आता कोरोनाबाधितांची संख्या 39 हजार 940 पर्यंत पोहोचली असून 1,301 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. तर आतापर्यंत बरे होऊन रुग्णालयातून घरी गेलेल्यांची संख्या 10 हजार 632 इतकी आहे. त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्यांची संख्या 28 हजार 46 इतकी आहे.
रुग्ण दुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी आता 12 दिवस इतका झाला आहे. गेल्या आठवडय़ात तो 10 दिवस इतका होता. याचाच अर्थ कोरोना प्रसाराचा वेग दिवसेंदिवस कमी होत आहे. ही समाधानाची बाब असून लवकरच बाधितांची संख्यावाढ स्थिरावेल आणि त्यानंतर ती कमी होण्यास प्रारंभ होईल, अशी आशा केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव लव अग्रवाल यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र पुढेच
आतापर्यंत झालेल्या 1 हजार 301 मृत्यूंपैकी महाराष्ट्रात 521 आहेत. हे प्रमाण एकंदर मृत्यूंच्या साधारणतः 40 टक्के आहे. त्याखालोखाल गुजरात असून त्या राज्यात 262 मृत्यू झाले आहेत. मध्यप्रदेश 151, राजस्थान 65, दिल्ली 64, उत्तर प्रदेश 43, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश प्रत्येकी 33 अशी इतर राज्यांमधील मृतांची संख्या असल्याचे रविवारच्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
याशिवाय, तामिळनाडू राज्यात 29, तेलंगणामध्ये 28, कर्नाटक 25, पंजाब 20, जम्मू-काश्मीर 8, तर केरळ, बिहार आणि हरियाणात प्रत्येकी 4 मृत्यू झाले आहेत. मेघालय, हिमाचल प्रदेश, ओडीशा आणि आसाममध्ये प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे. देशातील सात राज्ये व केंद्रशासित प्रदेश पूर्ण कोरोनामुक्त आहेत.
विशेष काळजी घेण्याची सूचना
देशातील आठ महानगरांमध्ये कोरोनाचे जास्तीत जास्त रुग्ण आहेत. त्यात मुंबई, दिल्ली, पुणे, चेन्नई, जयपूर, आग्रा, इंदूर आणि लखनौचा समावेश आहे. मुंबईत बाधितांच्या संख्येने 6 हजाराचा आकडा गाठला आहे.
सीमा सुरक्षा दलालाही लागण
भारताच्या सीमा सुरक्षा दलातही कोरोनाने शिरकाव केला आहे. आतापर्यंत या संस्थेच्या 42 सैनिकांना या आजाराची लागण झाली आहे. इक्रम हुसेन या सैनिकाचा मृत्यूही याच आजाराने चार दिवसांपूर्वी झाला आहे. सर्व बाधित सैनिकांवर सेनेच्या रुग्णालयात तातडीने उपचार सुरू आहेत.
तबलिगी जमात जबाबदार
उत्तर प्रदेशात कोरोनाचा प्रसार होण्यासाठी तबलिगी जमात जबाबदार असल्याचा आरोप या राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला. राज्यात आतापर्यंत सापडलेल्या रुग्णांपैकी 56 टक्के तबलिगी जमातीचे किवा तिच्याशी संलग्न आहेत. देशात इतरत्रही याच लोकांनी कोरोना अधिक प्रमाणात पसरविल्याचा आरोप आहे.
भारतात मृत्यूदर सर्वात कमी
कोरोनाबाधितांचा मृत्यू होण्याचे प्रमाण भारतात जगातील इतर प्रमुख देशांपेक्षा बरेच कमी आहे. एकंदर रुग्णांपैकी 3.2 टक्के रुग्ण मृत पावत आहेत. गेल्या दोन आठवडय़ांमध्ये हे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. याचाच अर्थ अधिकाधिक बाधित बरे होत असून ही समाधानाची बाब असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.