साऱयांनीच कोरोना योद्धे होण्याची आवश्यकता ‘मन की बात’मधून पंतप्रधान मोदींचे आवाहन
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतातील लोकांनीच कोरोनाविरोधात युद्ध पुकारले आहे. हे लोकयुद्ध हा या महासंकटावर मात करण्याचा एकच मार्ग आहे. तथापि, हे युद्ध जिंकेपर्यंत करायचे असून कोणत्याही क्षणी त्यात बेसावधपणा येता कामा नये, असा स्पष्ट आवाहनात्मक इशारा पंतप्रधान मोदी यांनी दिला. मन की बात या कार्यक्रमात ते रविवारी बोलत होते. लोकांनी सजग राहण्याची सूचनाही त्यांनी केली. या संकटामुळे जगाला योग आणि आयुर्वेद या भारतीय शास्त्रांचे आणि त्यांनी दाखविलेल्या मार्गाचे महत्व कळून येईल, असा विश्वासही त्यांनी प्रकट केला.
दुसऱया लॉकडाऊनचा कालावधी आता संपत आलेला आहे. तसेच केंद्र सरकार व काही राज्यसरकारांनी काही आर्थिक व्यवहार सुरू करण्याच्या दिशेने पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. अर्थव्यवस्था गतीमान करण्यासाठी हे आवश्यक आहे. मात्र लॉकडाऊनमध्ये सौम्यता आणल्यानंतरही लोकांनी मुखावरण (मास्क) उपयोगात आणणे, शक्य तर हातमोजे उपयोगात आणणे आणि शारिरीक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) राखणे असे नियम अनिवार्यपणे पाळायलाच हवे आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांच्याकडून हे महत्वपूर्ण आवाहन करण्यात आले आहे.
अतिआत्मविश्वास नको
आपण राहतो किंवा काम करतो त्या भागांमध्ये कोरोनाची लागण झालेली नाही. त्यामुळे आपल्यालाही तो झालेला नाही अगर होणार नाही, अशा भ्रमात कोणी राहू नये. आपले शहर, गाव, वस्ती, खेडे, गल्ली किंवा कार्यालय येथे कोरोना पोहोचलेला नाही. त्यामुळे आपण सुरक्षित आहोत, असा अतिआत्मविश्वास फसवा ठरू शकतो, हे त्यांनी लोकांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न केला.
कोरोना योद्धे व्हा
कोरोनाविरूद्धच्या या युद्धात असंख्य भारतीयांचे योगदान आहे. आपण सर्वांनीच आता येद्धे बनून विजय मिळविला पाहिजे. म्ददहैग्दे.म्दन्.ग्ह या वेबसाईटवर आपली नोंद करून आपण या युद्धात सहभागी होऊ शकता. आजवर 1 कोटी 25 लाखांहून अधिक कार्यकर्ते, डॉक्टर्स, वैद्यकीय व्यावसायिक, सामाजिक संघटना यावर नोंद झाल्या आहेत. त्यांची माहिती आपल्याला मिळू शकते. या माहितीवरून आपण साहाय्याताकार्य करू शकता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्ये, संस्थांची स्तुती
देशातील राज्य सरकारे आणि कोरोनाविरूद्धच्या युद्धात आघाडीवर असलेल्या सामाजिक व नागरी संस्था यांच्या अथक कार्याचे पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केले. विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आणि सरकारी अधिकाऱयांनी या संग्रामात जो निर्धार आणि पराक्रम दाखविला आहे, त्याला खरोखरच तोड नाही. त्यांच्या महान कार्यामुळेच आज आपण उद्योग व व्यवसाय काही प्रमाणात सुरू करण्याच्या स्थितीत आलो आहोत, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. लॉकडाऊनमुळे हातावरचे पोट असणाऱयांना बऱयाच त्रासाला तोंड द्यावे लागले. मात्र अशा लोकांच्या आहाराची व्यवस्था करणाऱया सामाजिक संस्थांचीही त्यांनी प्रशंसा केली.
सावधानी हटी, दुर्घटना घटी
बेसावधपणे वाहन हाकल्यास दुर्घटना घडते. त्यामुळे जोपर्यंत आपण आपल्या इच्छित स्थळी जाऊन पोहचत नाही, तोपर्यंत सावधपणा बाळगावाच लागणार आहे. हे पटवून देण्यासाठी त्यांनी ‘सावधानी हटी, दुर्घटना घटी’ या हिंदी म्हणीचा उपयोग आपल्या संदेशात केला. आग, कर्ज आणि आजारपण यांच्याकडे दुर्लक्ष केल्यास ते डोंगराएवढे मोठे होतात. म्हणून त्यांना वेळीच संपवले पाहिजे, अशा अर्थाचा संस्कृत श्लोकही त्यांनी संदेशात सांगितला.
मास्क हे आता सुसंस्कृततेचे प्रतीक
मुखावरणाचा (मास्क) उपयोग करणे, हे यापुढच्या काळात नागरी सुसंस्कृतपणाचे प्रतीक बनणार आहे. याचा अर्थ असा की प्रत्येक सभ्य आणि सुसंस्कृत नागरीक यापुढे या साधनाचा उपयोग घराबाहेर जाताना आवर्जून करणार आहे. तशी वेळच आली आहे. जी व्यक्ती हे साधन उपयोगात आणणार नाही, त्याला समाज सभ्य नागरीक समजणार नाही, असेही त्यांनी सूचित केले.
काय म्हणाले मोदी…
ड सर्व हिंदूंनी बैसाखी, बिहू, पुथांदू इत्यादी नववर्षारंभ घरातच केले साजरे
ड दो गज दूरी, बहुत है जरूरी, हा मंत्र प्रत्येकाने आचरण्याची आवश्यकता
ड पोलीसांचे कार्य आणि मानवतेमुळे लोकांच्या त्यांच्यासंबंधीच्या मतात बदल ड स्वच्छता कामगारांची कामगिरी अतुलनीय, वाढला त्यांच्यासंबंधीचा आदर