बेळगाव
कोरोनाविरुद्ध प्राणपणाने लढणाऱया डॉक्टर, परिचारिका व वैद्यकीय कर्मचाऱयांना सरकारने दिलेल्या सवलती एक एक करत काढून घेतल्या जात आहेत. राज्य सरकारने यासंबंधी सर्व जिल्हाधिकाऱयांना आदेश दिले असून वेगवेगळय़ा वसतिगृहात त्यांना विश्रांतीसाठी देण्यात आलेल्या खोल्या खाली करण्याची सूचना करण्यात आली आहे.
आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी यासंबंधी एक आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार कोरोना योद्धय़ांना दिलेल्या खोल्या खाली करण्याची सूचना करण्यात आली आहे. ‘यापुढे तुम्हाला क्वारंटाईनची गरज नाही. सेवा बजावल्यानंतर तुम्ही तुमच्या घरी जाऊ शकता’, असा सल्ला देण्यात आला आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका, ग्रुप डी कर्मचारी, तंत्रज्ञ यांना यापूर्वी सलग आठवडाभर सेवा बजावल्यानंतर 14 दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवण्याची व्यवस्था सरकारने केली होती. त्यांच्यासाठी शहरातील वेगवेगळय़ा वसतिगृहात खोल्या उपलब्ध करून दिल्या होत्या.
आता कोरोना रुग्णांवर उपचार करताना पीपीई किटचा वापर केल्यास संसर्ग रोगाचा धोका कमी आहे, असा निर्वाळा तज्ञांनी दिल्यामुळे त्यांना दिलेल्या सुविधा काढून घेण्यात आल्या आहेत. पीपीई किट वापरून प्रत्येक जण रुग्णसेवेत असतो. त्यामुळे त्यांना क्वारंटाईनची गरज नाही, असे सांगत त्यांना खोल्या खाली करण्यास सांगण्यात आले आहे.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोरोना वॉर्डमध्ये सेवा बजावणाऱया कर्मचाऱयांना शुक्रवारी यासंबंधीच्या सूचना मिळाल्या आहेत. त्यामुळे वॉर्डमध्ये सेवा बजावून आम्ही थेट घरी गेलो तर आमच्या कुटुंबीयांची अवस्था काय होईल, अशी भीती काही कर्मचाऱयांनी व्यक्त केली आहे. याबरोबरच रोज सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत परिवहन मंडळाने बससेवा सुरू केली आहे. बस, रेल्वेत बसण्याआधी प्रवाशांचे स्क्रिनिंग करावे. जर लक्षणे दिसून आल्यास त्यांना जवळच्या फ्लू क्लिनिकला पाठवून द्यावे, अशी सूचनाही आरोग्य विभागाने केली आहे.