ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी विमा संरक्षण योजना बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना संपुष्टात आणण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना 30 मार्च 2020 पासून राबविण्यात येत होती. कोरोना काळात आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची मदत देण्यात येत होती. सुरुवातीच्या 90 दिवसांसाठी ही योजना राबविण्यात आली होती. त्यानंतर या योजनेचा कालावधी 24 मार्च 2021 पर्यंत वाढविण्यात आला होता. या कालावधीत 736 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये अधिकृत असलेल्या 287 जणांच्या नातेवाईकांना विम्याचे 50 लाख रुपये देण्यात आले आहेत.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य सचिवांच्या या पत्रावरुन टीका होऊ लागल्यानंतर आरोग्यमंत्रालयाने ट्विटरवरुन यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. त्यात म्हटले आहे की, ’24 एप्रिल 2021 पर्यंत सध्याच्या विमा कंपनीकडून करण्यात आलेले सर्व दावे निकाली काढण्यात येणार आहेत. तसेच कोरोना योध्यांना विमा संरक्षण देण्यासंदर्भात आरोग्य मंत्रालय न्यू इंडिया ॲशोरन्स या कंपनीशी चर्चा करत आहे.’