उस्मानाबाद/प्रतिनिधी
कोरोना रुग्णांना कोविड सेंटमध्ये जे जेवण दिले जाते ते अतिशय निकृष्ट असल्यामुळे त्या जेवणाचा दर्जा सुधारण्यात यावा. जर जेवणाचा दर्जा सुधारण्याकडे दुर्लक्ष केले तर आंदोलन करण्यात येईल असा थेट इशारा शेतकरी संघर्ष समितीचे संयोजक संजय पाटील – दुधगावकर यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, कोरोना या महामारीने जगभर थैमान घातलेले असताना जिल्ह्यातही दररोज दीडशे ते दोनशे रुग्ण वाढत आहेत. रुग्ण संख्येत वाढ होत असताना जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या सुविधेत प्रचंड अडचणी निर्माण झाल्या आहेत. रुग्णांवर वेळेवर उपचार करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत असल्याने काही रुग्णांचे उपचारा अभावी मृत्यू झाल्याच्या तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरसह जिल्ह्यातील सर्व ठिकाणी डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरावीत. तसेच धक्कादायक बाब म्हणजे कोविड सेंटर किंवा कोरोना संशयित रुग्णांना क्वारंटाईन केलेल्या ठिकाणी देण्यात येणारे दोन वेळचे जेवण अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. त्यामुळे रुग्णांना सकस आहार देण्यात यावा अशी शासनाची अपेक्षा असताना देखील याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
वास्तविक या जेवणाचे एका वेळचे दर चाळीस रुपये तर नाश्त्याचे वीस रुपये एवढे आहेत. ४० रुपयांमध्ये जेवणात चपाती, सुखी भाजी, डाळ व भात असा मेनू आहे. मात्र इतक्या कमी दरात सकस आहार प्रोटीनयुक्त जेवण कसे मिळणार ? हा प्रश्नच आहे. साधारणपणे हॉटेलमध्ये चाळीस रुपयात पोटभर नाश्ताही मिळू शकत नाही. अशा परिस्थितीत निकृष्ट दर्जाचे जेवण रुग्णांच्या माथी मारले जात असल्याचा किळसवाणा प्रकार सुरू आहे. तर बहुतांश जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांना तसेच क्वॉरंटाईन सेंटरमधील संशयितांना सकाळच्या नाष्ट्यामध्ये मागणीनुसार दूध, केळी व अंडी आदी प्रकारचे सकस आणि पौष्टिक खाद्यपदार्थ देण्यात येत आहेत. तर दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात पौष्टीक पदार्थ दिले जातात.
एका वेळच्या जेवणावर १०० रुपयांपेक्षा अधिकचा खर्च केला जातो. विशेष म्हणजे जेवणाचे दर वेगवेगळे पोष्टिक पदार्थ दिले जातात एका वेळच्या शंभर रुपयापेक्षा अधिक खर्च केला जातो. विशेष म्हणजे शासनाने जेवणाचे दर आणि मेनू ठरविण्याचे अधिकार स्थानिक स्तरावरील अधिकाऱ्यांना दिले असताना सकस आहारापासून रुग्णांना वंचित ठेवण्याचा दुर्दैवी प्रकार घडत आहे. त्यामुळे रुग्णांना तसेच क्वारंटाईनमधील संशयितांना दर्जेदार आहार द्यावा, मागणीनुसार दूध, अंडी व केळी आदी पदार्थांचा समावेश करावा अन्यथा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संजय पाटील – दुधगावकर यांनी दिला आहे.