मतदानासाठी क्वॉरंटाईन सोडणे पूर्णपणे चुकीचे : कोरोना रुग्ण बाहेर पडल्यास संसर्ग पुन्हा वाढण्याचा धोका : रुग्णांना पीपीई किट देणार तर कर्मचाऱयांना का नाही?
उपस्थित झालेले प्रश्न…
- कोरोना रुग्णांच्या बोटाला दोन मीटरवरुन शाई कशी लावायची?
- मतदाराची सही घेणे, त्याला मतपत्रिका देणे ही कामे कशी करायची?
- रुग्ण शिंकले, खोकले तर कर्मचारी, मतदारांना धोका नाही काय?
प्रतिनिधी / पणजी
कोरोना रुग्णांना जि. पं. निवडणुकीसाठी मतनदान केंद्रात येऊन मतदान करण्यास अनुमती देण्यात आल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत असून त्यांना मतदानाकरीता बोलावू नये व त्यांनी मतदान करू नये, अशी मागणी मतदान केंद्रातील कर्मचारी, अधिकारी वर्गाकडून, तसेच अन्य मतदारांकडूनही पुढे आली आहे. कोरोना रुग्ण मतदानासाठी आले आणि मतदान केंद्रावर शिंकले, खोकले व नंतर आम्हाला कोरोना झाला तर? असा त्यांचा सवाल असून रुग्णांना पीपीई किट देणार तर मग आम्हाला का नाही? असा प्रश्न अधिकारी, कर्मचाऱयांनी उपस्थित केला आहे.
मार्गदर्शक तत्वानुसार कोरोना रुग्णांना 4 दिवस आयसोलेशन क्वारंटाईन ठेवण्यात येते, मग त्यांना मतदान केंद्रावर मतदानासाठी बोलावणे कितपत योग्य आहे, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
मतदानासाठी क्वारंटाईन सोडणे पूर्णपणे चुकीचे
मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचारी, अधिकारीवर्गाने कोरोना रुग्णांची धास्ती घेतली असून चिंता प्रकट केली आहे. सरकारला जि. पं. निवडणुकीतून कोरोनाचे संक्रमण वाढवायचे आहे की काय अशी शंका निर्माण झाली असून कोरोना रुग्णांना 14 दिवसांचे क्वारंटाईन सोडून मतदानासाठी बोलावणे पूर्णपणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. कोरोना रुग्ण मतदानासाठी येणार असल्याने त्यांच्यात खळबळ माजली आहे.
कोरोना रुग्णांना मतदान केंद्रावरील कर्मचाऱयांचा विरोध
कोरोना रुग्णांना मतदान केंद्रावर येण्यास व मतदान करण्यास केंद्रातील नियुक्त कर्मचारी, अधिकारी वर्गाने विरोध केला असून त्या रुग्णांच्या मतदानासाठी सरकारने वेगळी सोय करावी, अशी त्यांची मागणी असल्याचे समोर येत आहे. सरकारने कोरोना रुग्णांच्या मतदानासाठी स्वतंत्र एसओपी जारी करावी, अशी मागणी होत असून त्यांना मतदान केंद्रावर येण्यापासून रोखावे असे त्या वर्गाचे म्हणणे आहे.
कोरोना रुग्ण बाहेर पडल्यास संसर्ग पुन्हा वाढण्याचा धोका
कोरोना रुग्णांना जर हॉस्पिटल, कोविड सेंटर किंवा घरातून बाहेर काढून मतदान केंद्रावर आणले तर कोरोना वाढण्याचा धोका मतदान केंद्रावरील कर्मचारी, अधिकारी तसेच मतदारांनीही वर्तविला आहे. सध्या गोव्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असताना आणि तो वाढू नये म्हणून दक्षता घेण्याची गरज आहे. अशा वेळी जर गाफील राहिलो तर जि. पं. निवडणूक मतदानातून कोरोना संसर्ग वाढण्याचा मोठा धोका असल्याचे सर्वसाधारण मत जनसामान्यातून प्रकट होत आहे.
मतदान केंद्रातील कर्मचारी, अधिकारी बिथरले
कोरोना रुग्णांना शाई कोण लावणार, असा प्रश्न काहीजणांनी केला असून त्यांची सही घेणे, मतपत्रिका देणे, मतपेटीत त्याने मतपत्रिका टाकणे, त्याची ओळख तपासणे या कामात त्यांच्याशी संपर्क येणार असल्याने मतदान केंद्रातील कर्मचारी, अधिकारी खूपच बिथरले आहेत. सरकार आम्हाला कोरोनाच्या संकटात टाकणार की काय असा सवाल त्यांनी केला आहे.
मतदानासाठी कर्मचाऱयांना 12 रोजी भरपगारी सुट्टी
राज्यात दि. 12 डिसेंबर रोजी जिल्हा पंचायत निवडणूक असल्याने त्या दिवशी सर्व कर्मचाऱयांना भरपगारी रजा असेल, अशी अधिसूचना अवर सचिव (सामान्य प्रशासन) श्रीपाद आर्लेकर यांनी जारी केले आहे. पंचायत क्षेत्रात राहणारे औद्योगिक कर्मचारी सरकारी खात्यातील रोजंदारीवरील कर्मचारी खासगी क्षेत्रातील कर्मचारी व इतर सर्व कर्मचाऱयांना भरपगारी रजा असेल, असे या अधिसूचनेत म्हटले आहे.
मतदानावेळी पाळायची मार्गदर्शक तत्वे जारी
राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाने कोरोना रुग्णांसाठी जि. पं. निवडणूक मतदानाकरीता मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. शेवटच्या एका तासात म्हणजे सायंकाळी 4 ते 5 या वेळेत पीपीई किट घालून त्यांना मतदानाची अनुमती देण्यात आली आहे. त्याशिवाय इतर मतदारांसाठी देखील अटी बंधनकारक केल्या आहेत.
सर्व मतदान केंद्रावर मतदारांची थर्मल गन चाचणी करण्यात येणार आहे. एखाद्या मतदाराचे तापमान मर्यादेपेक्षा जास्त आढळले तर त्याला वेगळे बसवून पुन्हा 10 मिनिटांनी त्याचे तापमान तपासले जाणार आहे. दुसऱया तपासणीतही तापमान जास्त आढळले तर त्यास सायंकाळी 4 ते 5 या वेळेत मतदानासाठी बोलावले जाणार आहे.
मार्गदर्शक तत्वांचे कडक पालन होणार
मतदारांनी सामाजिक अंतर पाळावे म्हणून 2 मीटर अंतर अधोरेखित करण्यात येणार असून त्यानुसार मतदारांना हळहळू मतदान केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशद्वारावर सॅनिटायझरची सोय करण्यात येणार असून मतदारांनी त्याचा वापर करूनच मतदानासाठी पुढे जायचे आहे. मतदान केंद्रातील सर्व साहित्य, टेबल, खुर्च्या, इतर फर्निचर मतपेटी इत्यादीचे सॅनिटायझेशन करण्यात येणार असून स्वच्छता होणार आहे.
मास्क, सामाजिक अंतर, सेनिटायझरची सक्ती
मतदारांसह मतदान केंद्रातील कर्मचारी, अधिकारी व इतर सर्वांना मास्कची सक्ती करण्यात आली आहे. कोरोना रुग्ण मतदार किती आहेत याची निर्वाचन अधिकाऱयांनी नोंद करून त्यानुसार पीपीई किट उपलब्ध करून द्यावेत अशी सूचना देण्यात आली आहे. सर्वानी मतदान केंद्रावर सर्व प्रकारची स्वच्छता पाळायची असून कोणीही कुठेही थुंकू नये तसेच खोकला, शिंका येत असल्यास त्यांनी काळजी घेऊन बाजूला व्हावे आणि हातरुमाल, टिश्यू पेपरचा वापर करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी असे सुचविले आहे. त्या करीता कचरा पेटी ठेवावी, हेच नियम मतमोजणी केंद्रातही लागू होणार असल्याचे एसओपीत नमूद करण्यात आले आहे.
राज्यात 11, 12 व 14 रोजी मद्यविक्रीस बंदी
राज्यात शनिवार 12 डिसेंबर रोजी जिल्हा पंचायत निवडणुकीचे मतदान तसेच 14 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याने दि. 11, 12 व 14 डिसेंबर रोजी मद्यविक्रीला बंदी घालण्यात आली आहे. राज्य सरकारने त्या बाबतची अधिसूचना जारी केली आहे.
उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्यातील सर्व जिल्हा पंचायत मतदारसंघातील क्षेत्रात असलेली मद्यविक्री दुकाने 11 डिसेंबर रोजी मद्यरात्री 12 वाजल्यापासून 12 डिसेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत तसेच 14 डिसेंबर रोजी वरील वेळेत बंद ठेवण्याचा आदेश सरकारने दिला आहे. बार आणि रेस्टॉरंट असलेल्यांनी बार तिन्ही दिवस बंद ठेवावेत आणि रेस्टॉरंट फक्त अन्न-खाद्यपदार्थ देण्यासाठी सुरू ठेवावेत. त्या सोबत मद्यविक्री करू नये. बार-रेस्टॉरंट मालकांनी मद्यविक्री होणार नाही, असे फलक लावावेत, अशी सूचना करण्यात आली आहे. रेस्टॉरंट खुले आहे आणि तेथे फक्त अन्न खाद्यपदार्थ मिळतील, असेही फलकावर नमूद करावे, असे अधिसूचनेत म्हटले आहे. वित्त खात्याचे अवर सचिव प्रणब भट यांनी सदर अधिसूचना जारी केली आहे.