ऑनलाईन टीम / पुणे :
कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी खासगी अनुभवी डॉक्टरांची मदत घेण्यात येणार आहे. आतापर्यंत झालेल्या मृत्युंपैकी २४ तासांत मृत्यमुखी पडलेले अवघे १२ रुग्ण असल्याने मृत्यू नक्की कशामुळे होत आहेत, याचा शोध घेण्यासाठी माहितीचे ऑडिट करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.
कोरोनाबाबतच्या सद्यस्थितीची माहिती देण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. जिल्हाधिकारी राम म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी अनुभवी डॉक्टरांची मदत घेतली जाणार आहे. मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्यात आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांपैकी उपचारासाठी दाखल झाल्यानंतर २४ तासांमध्ये मरण पावलेले अवघे १२ जण आहेत. त्यामुळे मृत्यू नक्की कशामुळे होत आहेत, याचा शोध घेण्यासाठी या माहितीचे ऑडिट करण्यात येणार आहे. खासगी रुग्णालयांकडून रुग्णांना दाखल करून घेण्यात येत आहे. रुग्णांना सरकारी योजनांचा लाभ दिला जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.ग्रामीण भागात पुणे आणि मुंबईहून येणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे गेल्या सात दिवसांत करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झालेली दिसून येत आहे, असेही ते म्हणाले.