सिंधुदुर्गसह विख्यात मराठी लेखकांचे जाहीर निवेदन : महामारीत निधन झालेल्यांना वाहिली श्रद्धांजली : श्रीमंतांना जे उपचार मिळतात, तेच गरिबातल्या गरिबालाही मिळावेत! : शासनाने रोजगारही उपलब्ध करून द्यावेत!
प्रतिनिधी / कणकवली:
गरीब-श्रीमंत असा भेदभाव न करता महाराष्ट्रासह देशातील सर्वच कोरोना रुग्णांना मोफत उपचार द्यावेत. सरकारी दवाखान्यांची संख्या व दर्जा वाढविण्यात यावा. वैद्यकीय सेवांचे राष्ट्रीयीकरण व्हावे. वैद्यकीय विम्यावर अवलंबून असणे बंद करावे. अशाही काळात शासनाने गरिबांना रोजगार उपलब्ध करून द्यावेत, असे जाहीर निवेदन सिंधुदुर्गसह विख्यात मराठी लेखकांनी प्रसिद्धीस दिले आहे.
कोरोना या महासंकटाच्या काळात घडणाऱया शोकात्मक घटनांच्या उद्विग्न मनाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात लेखकांमध्ये ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ, रामदास भटकळ, विख्यात नाटककार महेश एलकुंचवार, ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर तसेच निशिकांत ठकार, रा. रं. बोराडे, वसंत आबाजी डहाके, चंद्रकांत पाटील, रंगनाथ पठारे, सतीश काळसेकर, वसंत दत्तात्रय गुर्जर, प्रभा गणोरकर, अरुण खोपकर, वसंत पाटणकर, दत्ता भगत, प्रेमानंद गज्वी, कौतिकराव ठाले-पाटील, मकरंद साठे, राजन गवस, जयंत पवार, लक्ष्मीकांत देशमुख, सतीश तांबे, जयदेव डोळे, सुनील तांबे, अनुराधा पाटील, प्रफुल्ल शिलेदार, प्रमोद मुनघाटे, प्रवीण बांदेकर, अजय कांडर, गणेश विसपुते, आसाराम लोमटे, प्रज्ञा दया पवार, रमेश इंगळे उत्रादकर, नीरजा, नितीन रिंढे, किशोर कदम, रणधीर शिंदे, श्रीधर नांदेडकर, अविनाश गायकवाड, संजय आर्वीकर, प्रकाश होळकर, दिनकर मनवर, संध्या नरे-पवार, दिलीप धोंडगे, प्रकाश किनगावकर, दिलीप चव्हाण, गोरख थोरात, राजा होळकुंदे, गौतमीपुत्र कांबळे, रामचंद्र काळुंखे, रवी कोरडे, संदीप जगदाळे आदींचा समावेश आहे.
निवेदनात लेखक म्हणतात, अभूतपूर्व अशा साथीच्या रोगाने झालेल्या लाखो लोकांच्या अकाली मृत्यूने आणि सगळीकडे पसरलेल्या आजाराने सारे जग विस्कळीत झालेले आहे. ही केवळ रोगाची साथ नसून हा सामाजिक आणि आर्थिक भूकंपही आहे. यातून झालेला विनाशही विषमतामूलक आहे हे विसरता नये. मानवी इतिहासातील सगळय़ात दारुण घटना असेच या काळाचे वर्णन करावे लागेल. अशा प्रसंगी आम्ही सगळे या महामारीत मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली वाहतो. सगळय़ा पीडितांप्रती सहानुभूती व्यक्त करतो तसेच मानवतेकरिता झटणाऱया वैद्यकीय क्षेत्रातल्या सगळय़ांना कृतज्ञता व्यक्त करतो. या महासंकटामुळे कोटय़वधी लोक बेरोजगार झाले आहेत. त्यांच्या तोंडचा घास हिरावला गेलेला आहे. संकटात सापडलेल्या आपल्या लोकांवर आपण नीट उपचारही करू शकत नाही. इतक्मया मोठय़ा प्रमाणात भेदभाव आणि विषमता असलेला समाज आपणच निर्माण केला आहे हे या संकटाने दाखवून दिलेले आहे.
‘एक तीळ सर्वांनी करंडून खावा..’
या संकटाच्या प्रसंगी आम्ही लेखक सगळय़ांसोबत असून आम्ही हे सूचवित आहोत की, सगळय़ांना विनाशुल्क उपचार उपलब्ध व्हावेत. देशातल्या सगळय़ात गरीब माणसालाही तेच उपचार मिळावेत, जे देशातल्या सगळय़ात श्रीमंत आणि वजनदार माणसाकरिता उपलब्ध असतात, सरकारी दवाखान्यांची संख्या आणि दर्जा वाढविण्यात यावा, वैद्यकीय सेवांचे राष्ट्रीयीकरण व्हावे. वैद्यकीय विम्यावर अवलंबून असणे बंद करावे, रोजगाराचा अधिकार हा मूलभूत अधिकार मानला जावा, प्रत्येकाने आपला घास आजूबाजूच्या लोकांसोबत वाटून खावा, प्रत्येक लेखकाने आपल्याला मिळालेले अन्न तसेच आपल्या उत्पन्नाचा जास्तीत जास्त भाग सहाय्यता निधीस आणि सहाय्यता करणाऱया स्वयंसेवी संघटनांना द्यावा. नामदेव ढसाळांच्या शब्दात सांगायचे झाल्यास अशाप्रसंगी ‘एक तीळ सर्वांनी करंडून खावा’, असे आवाहन आम्ही करत आहोत.