ऑनलाईन टीम / पुणे :
कोरोना रुग्णांवर वेगवेगळया रुग्णालयात डॉक्टर आणि नर्स उपचार करत आहेत. त्यामुळे डॉक्टर, नर्स यांचाही जीव धोक्यात आहे. त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयाची काळजी सरकारने करणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱया डॉक्टर, नर्सचा लवकरच विमा काढण्यात येईल. यासंदर्भात लवकरच मुंबईत निर्णय घेऊन जीआर काढला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
अजित पवार म्हणाले, राज्यात कोरोना बाधितांची संख्या 63 वर पोहचली आहे. झाली राज्यशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत काढलेल्या सर्व निर्णयाची अंमलबजावणी 31 मार्च 2020 पर्यंत होणार होती. परंतु, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता शासनाचा पुढील आदेश निघेपर्यंत ती अनिश्चित काळासाठी लागू असणार आहे. अंत्यविधी, दहावे, तेरावे याठिकाणी लोकांनी गर्दी करणे सध्या टाळले पाहिजे. लग्नांच्या तारखा पुढे ढकलणे आवश्यक आहे. लग्नाच्या तारखा पुढे न ढकल्यास 25 लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पाडावा.
कोरोनाचा तिसरा टप्पा महत्त्वाचा असून विनाकरण गर्दी, अनावश्यक प्रवास टाळले पाहिजेत. गरज पडली तर मुंबईमध्ये ज्याप्रकारे वेळप्रसंगी लोकल, बस बंद करण्याचा निर्णय घेण्याची शासनाची मानसिकता आहे. त्याप्रमाणे वेळप्रसंगी पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये तो निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.