प्रतिनिधी / गुहागर
तालुक्यात कोरोना रूग्णांना दिली जाणारी औषधे म्हणजे भुगा झालेल्या गोळ्या व रंग उडालेली औषधे असून अशा औषधांनी रूग्ण बरा होईल का, असा सवाल करत पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश सावंत यांनी ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱयांना धारेवर घेतले. यावर आपल्या सुचनेनंतर औषधे आम्ही बदलली असल्याचे उत्तर येथील वैद्यकीय अधिकारी यांनी दिले.
गुहागर पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश सावंत यांनी या बाबत आक्रमक पावित्रा घेतला. त्यांच्या कोरोना पॉझिटिव्ह नातेवाईकाला दिलेल्या औषधामुळे हा प्रकार उघडकीस आला. गोळयांच्या पाकिटावर एक्सपायरी डेट नव्हती. देण्यात आलेल्या गोळ्या काळया पडलेल्या व गोळयांचा पाकिटामध्येच भुगा झालेला दिसून आला. या बाबत त्यांनी गुहागर ग्रामीण रूग्णालयात जात वैद्यकीय अधिकाऱयांना धारेवर धरले. रूग्णांना औषधे देताना ती नक्की बरे होण्यासाठीच दिली जातात ना, असा सवाल त्यांनी केला. गोळय़ा वितरित करताना कर्मचाऱयाने खबरदारी का घेतली नाही, खराब गोळयांचा रूग्णावर विपरित परिणाम झाला तर याला जबाबदार कोण, असा सवालही यावेळी केली. यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. बळवंत यांनी जिल्ह्य़ावरून येणारी औषधे दिली जात आहेत. गोळय़ाचा भुगा झालेली औषधे थांबवून दुसरी औषधे दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
औषधाचा ‘तो’ लॉट थांबवला- डॉ. बळवंत
रूग्णांना दिल्या जाणाऱया ऍन्टीबायोटिक औषधाच्या पाकीटामधील गोळयांचा भुगा झालेला होता ही वस्तुस्थिती आहे. माजी सभापती सुरेश सावंत यांनी याबाबतची सुचना दिल्यानंतर तो संपूर्ण लॉटच थांबवण्यात आला असून दुसऱया लॉटमधील औषधे दिली. मात्र दिलेले औषध मुदतबाह्य नाही. या औषधांच्या गोळयाचा लवकर भुगा होतो. जिल्हा स्तरावरून येणारी औषधेच या रूग्णालयातून वितरीत होतात, असेही डॉ. बळवंत यांनी ‘तरूण भारत’ला सांगितले.
आरटीपीसीआर चाचणी तालुका स्तरावर सुरू करावी
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मोठया प्रमाण ऍन्टीजेन व आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात आहेत. ऍन्टीजेनचा निकाल त्वरीत मिळतो. मात्र आरटीपीसीआरचा अहवाल तीन ते चार दिवसांनी येत आहे. यामुळे स्वॅब दिलेल्या व्यक्तीची अहवाल येईपर्यंत संभ्रमावस्था होते. चाचणीचा अहवाल त्वरीत मिळाला तर तातडीने उपचार उपलब्ध होतील.. यासाठी आरटीपीसीआर तपासणी तालुका स्तरावरही सुरू करावी अशी मागणी सुरेश सावंत यांनी केली आहे.