ऑनलाईन टीम / बारामती :
बारामती शहरासह ग्रामीण भागात अजूनही हव्या त्या प्रमाणात रूग्ण संख्या कमी होताना दिसत नाही, त्यामुळे हलगर्जीपणा करून चालणार नाही. कोरोना रूग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करत शर्थीचे प्रयत्न करा, निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -19 विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घेतला. त्यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले की, सध्या बारामती शहर व ग्रामीण भागातील रूग्ण संख्या काही प्रमाणात कमी होत आहेत परंतु हे प्रमाण समाधानकारक नाही. अजून काही प्रमाणात म्हणजेच रूग्णसंख्या कमी आल्याशिवाय बारामती तालुक्यातील निर्बंध शिथील करता येणार नाहीत. जर गर्दी वाढत राहीली तर दिवसाआड एका बाजूची दुकाने चालू ठेवण्याची परवानगी देण्यात येईल. जर रूग्ण संख्या 5 टक्क्यांच्या आत आली तर आपल्याला पूर्णपणे निर्बंध शिथील करता येतील. शासन व स्थानिक प्रशासन कोरोना प्रार्दुभाव कमी करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. नागरिकांनीही शासनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी तसेच अन्यत्र गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल याची सर्वांनीच दक्षता घेणे आवश्यक आहे. लसीकरणाचे योग्य नियोजन करावे.
म्युकरमायकोसिस रुग्णांसाठी इंजेक्सशनचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. कोविडशी लढण्याकरीता आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय साधन सामुग्री तसेच औषधे, ऑक्सिजनचे योग्य प्रकारे नियोजन करण्याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी असेही ते म्हणाले.
- कन्हेरी येथील उद्यानाचे पवारांच्या हस्ते भूमिपूजन
बारामती येथील कन्हेरी गावामध्ये जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कोविड 19 नियमांचे पालन करून वन विभागाकडून नव्याने उभारण्यात येणाऱ्या उद्यानाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपवनसंरक्षक पुणे राहूल पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी बारामती राहूल काळे व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.