विविध राज्यांनी उचलली ठोस पावले : प्रयत्नांना काही प्रमाणात यश मिळतेय
आरोग्य कर्मचाऱयांकरता महत्त्वाचा निर्णय
कोरोना विषाणू विरोधी युद्धात देशाला मदत करणाऱया नायकांसाठी दिल्ली सरकारने महत्त्वाची घोषणा केली आहे. या लढाईदरम्यान आरोग्य कर्मचाऱयाला जीव गमवावा लागल्यास त्याच्या कुटुंबाला दिल्ली सरकार 1 कोटी रुपयांची मदत करणार असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. स्वच्छता कर्मचारी, डॉक्टर आणि परिचारिकांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
उपराज्यपालांसोबत झालेल्या बैठकीनंतर केजरीवालांनी याची घोषणा केली आहे. कोरोना विरोधी लढाईत सहकार्य करणाऱया कर्मचाऱयांची पूर्ण काळजी दिल्ली सरकार घेणार आहे. विषाणूचा संसर्ग रोखताना खासगी रुग्णालयाचा कर्मचारी मृत्युमुखी पडला तरीही मदत केली जाणार असल्याचे केजरीवालांनी स्पष्ट केले आहे. दिल्लीत आतापर्यंत कोरोनाचे 121 रुग्ण सापडले आहेत. यातील 113 जणांवर उपचार सुरू आहे. तर 6 जण पूर्णपणे बरे झाले आहेत. कोरोनामुळे दिल्लीत 2 जणांना जीव गमवावा लागला आहे.
तामिळनाडूत व्यापक सर्वेक्षण
कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता तामिळनाडूच्या 16 जिल्हय़ांत 182815 घरांमध्ये राहणाऱया जवळपास 6.88 लाख व्यक्तींचे कोरोना विषाणू नियंत्रण योजनेंतर्गत सर्वेक्षण करण्यात आले आहे. 31 मार्चपर्यंत 688473 व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. योजनेच्या अंतर्गत कोरोना रुग्णाच्या घरापासून 7 किलोमीटरच्या कक्षेतील परिसराची निवड करण्यात येत आहे. या क्षेत्रातील प्रत्येक घराची तपासणी करून कुणा व्यक्तीत कोरोना संसर्गाची लक्षणे आहेत का, याचा छडा अधिकारी लावणार आहेत. कोरोना विषाणूमुळे 25 मार्च रोजी राज्यात पहिला मृत्यू झाला होता. हा रुग्ण मदुराई येथील राजाजी रुग्णालयात दाखल होता. मृत व्यक्तीला रक्तदाब तसेच मधुमेहाचा त्रास होता.
इंदोरमध्ये एकूण 69 रुग्ण
मध्यप्रदेशचे इंदोर शहर आता देशाच्या 16 कोरोना हॉटस्पॉटमध्ये सामील झाले आहे. शहरातील रुग्णांची संख्या आता 69 वर पोहोचली आहे. तर राज्यातील एकूण रुग्णसंख्या 86 झाली आहे. राज्यात आतापर्यंत 6 जणांनी जीव गमावला आहे. रुग्णांच्या संपर्कातील लोकांच्या द्रवणाचे नमुने तपासणीसाठी येत असल्याने रुग्णसंख्या वाढणार आहे. शहरात रुग्णांचा आकडा 100 ते 200 पर्यंत जाण्याची शक्यता असून याकरता मानसिकदृष्टय़ा तयार आहोत. 625 पेक्षा अधिक जणांना विलग करण्यात आले आहे. 7 दिवसांपर्यंत कठोर धोरण लागू राहणार आहे. किराणा, भाजीपाला, दुधाची दुकानेही बंद राहणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली आहे.